तलाठी भरती : दिव्यांग आरक्षणावरून विद्यार्थ्यांमध्ये खदखद, विरोध वाढण्याचे चिन्ह
तलाठी पदाच्या भरतीसाठी विद्यार्थ्यांना २६ जून ते १७ जुलै या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. तसेच उमेदवारांना केवळ एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या महसूल विभागाकडून (Revenue Department) नुकतीच तलाठी पदाच्या (Talathi Recruitment) ४ हजार ६४४ जागांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आजपासून (सोमवारी) ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. पण त्याआधीच दिव्यांग आरक्षणावरून (Disability Reservation) विद्यार्थ्यांमध्ये (Students) नाराजी पसरली आहे. जाहिरात प्रसिध्द होण्याआधी जाहीर करण्यात आलेल्या ड्राफ्टमध्ये दिव्यांगांसाठी १८५ जागा होत्या. पण जाहिरातीमध्ये या जागा कमी दाखविण्यात आल्या आहेत. तसेच दिव्यांगांना गटनिहाय जागा न देता उपगटानुसार जागा दाखविण्यात आल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
तलाठी पदाच्या भरतीसाठी विद्यार्थ्यांना २६ जून ते १७ जुलै या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. तसेच उमेदवारांना केवळ एकाच जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामध्ये दिव्यांगांना चार टक्के आरक्षण असेल. त्यातही चार प्रमुख गट करण्यात आले असून प्रत्येक गटाला प्रत्येकी एक टक्के आरक्षण आहे. प्रत्येक गटात उपगटही आहेत. भरतीच्या ड्राफ्टमध्ये दिव्यांगांसाठी १८५ जागा होत्या. तसेच प्रत्येक जिल्ह्यात गटानुसार जागा दाखविण्यात आल्या होत्या. पण जाहिरातमध्ये उपगटानुसार जागांचे वाटप करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
तलाठी पदाच्या भरातीचा मुहूर्त सापडला; अखेर जाहीरात प्रसिद्ध
गट अ मध्ये अल्पदृष्टी किंवा दृष्टीहीन, गट ब मध्ये कर्णबधीर तर गट क मध्ये अस्थिव्यंग, सेरेबल पाल्सी, शारिरीक वाढ खुंटणे, स्नायूंची विकृती, आम्ल हल्लाग्रस्त, कुष्टरोग मुक्त, मेंदूचा पक्षाघात असे विविध उपगट आहे. गट ड मध्ये, स्वमग्नता, मानसिक आजार असे उपगट आहेत. ड्राफ्टमध्ये गटनिहाय एक टक्का आरक्षण दाखविण्यात आले होते. पण प्रत्यक्ष जाहिरात देताना उपगटांचा उल्लेख केल्याने अनेकांवर अन्याय होणार असल्याची भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
एज्युवार्ताशी संवाद साधताना एका अस्थिव्यंग विद्यार्थ्यांने सांगितले की, ड्राफ्टमध्ये गट क साठी एकूण २८ जागा दाखविण्यात आल्या होत्या. म्हणजे या गटातील सर्व उपगटांना त्यासाठी अर्ज करता येणार होते. पण जाहिरातमध्ये उपगटानुसार जागा दाखविण्यात आल्याने एकाच गटातील इतरांवर अन्याय होणार आहे. संपूर्ण जाहिरातीमध्ये राज्यात अस्थिव्यंगांसाठी केवळ चारच जागा आहेत. प्रत्यक्षात अस्थिव्यंग विद्यार्थ्यांचे अर्ज करण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. गट क मधील इतर उपगटांसाठी दाखविण्यात आलेल्या जागा मात्र अधिक आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये दिव्यांगांच्या जागा या चार गटांमध्येच विभागल्या जातात. त्यामुळे त्या गटातील सर्वांना समान संधी मिळते आणि गुणवत्तेनुसार निवड होते. पण तलाठी भरतीसाठी दिलेले आरक्षण अन्यायकारक आहे. राज्य शासनाने उपगटांना दिलेल्या जागा कशाच्या आधारे दिल्या, याबाबत माहिती देणे अपेक्षित आहे. त्यासाठी आम्ही संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना भेटून याबाबत मागणी करणार आहोत.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.