विद्यापीठ झाले उशीरा जागे; संशोधक विद्यार्थी, मार्गदर्शक यांच्यातील वाद मिटवण्याचे आदेश
तोंडी स्वरूपात येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्याचे आदेश विद्यापीठाने सर्व संलग्न संशोधन केंद्रांना दिले आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुण्यातील सांगावी येथील बाबुराव घोलप महाविद्यालयात (Baburao Gholap College)प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या महिला मार्गदर्शकाने (गाईड) शोध प्रबंध सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे 25 हजार रुपयांची (25 thousand rupees)लाच मागीतल्याची घटना समोर आल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ(Savitribai Phule Pune University) प्रशासन खडबडून जागे झाले.विद्यार्थी व गाईड यांच्यातील वादाचे (Dispute between student and guide)निराकरण करण्याचे आणि तोंडी स्वरूपात येणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्याचे आदेश विद्यापीठाने सर्व संलग्न संशोधन केंद्रांना (Research Center)दिले आहेत. तसेच संशोधन मार्गदर्शकांची व संशोधक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन किंवा ऑफलाईन बैठक घेऊन त्याबाबतचा अहवाल विद्यापीठाला 15 दिवसांत सादर करावा,असे परिपत्रक विद्यापीठातर्फे सर्व संशोधन केंद्रांना पाठवण्यात आले आहे.
विद्यापीठाने काढलेल्या परिपत्रकानुसार विभागप्रमुख/प्राचार्य/संचालक, र्व संलग्नित संशोधन केंद्रे यांना कळविण्यात येते की, आपल्या संशोधन केंद्रांमध्ये अनेक विद्यार्थी विविध विषयांवर संशोधन करीत आहेत. या पीएच्.डी. संशोधक विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.त्यामध्ये संशोधन मार्गदर्शक व त्यांचेकडील विद्यार्थी यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वादविवाद होत असतात.तसेच एकमेकांविषयी असलेल्या तक्रारी/निवेदने विद्यापीठाकडे लेखी स्वरूपात न दाखल होता तोंडी स्वरूपात प्राप्त होतात. त्यामुळे अशा तोंडी तक्रारीवर कार्यवाही करता येत नाही. परंतु, अशा तक्रारी आपल्याकडे प्राप्त होत असतील तर त्याची वेळीच दखल घेऊन त्याचे निराकरण करावे. पीएच्. डी. बाबत कोणतेही चुकीचे काम होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
सर्व संशोधन केंद्रांच्या प्रमुखांनी आपापल्या संशोधन केंद्रातील सर्व संशोधन मार्गदर्शकांची ऑफलाईन/ऑनलाईन पध्दतीने बैठकीचे आयोजन करावे. या बैठकीमध्ये संशोधन हा भाग महत्वाचा आहे तसेच संशोधनाची गुणवत्ता टिकवताना विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची अडवूणक/नुकसान/दिरंगाई होणार नाही,याबाबत दक्षता घेण्यास सांगावे.त्याचाप्रमाणे सर्व संशोधन केंद्रांच्या प्रमुखांनी आपापल्या संशोधन केंद्रात पीएच.डी. करिता नोंदणी केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांचे विषयनिहाय ऑफलाईन/ऑनलाईन पध्दतीने बैठकीचे आयोजन करावे. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडी-अडचणी असल्यास त्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना तातडीने करावी.
संशोधन केंद्रांमध्ये संशोधन करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताची काळजी घेणे आपले महत्वाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे.तसेच बैठकींचे आयोजन करून येत्या 16 एप्रिलपर्यंत शैक्षणिक प्रवेश विभागास त्याचा अहवाल सादर करावा.सर्व संशोधन केंद्रांचे अहवाल विद्यापीठास प्राप्त झाल्यानंतर विद्यापीठ कार्यक्षेत्रातील संशोधन केंद्र प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन विद्यापीठामार्फत करण्यात येणार आहे.
------------------------------