आरटीई लॉटरी काढली: RTE प्रक्रिया पारदर्शक,भ्रम निर्माण करू नका;शिक्षण आयुक्तांचा इशारा
विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर त्यांना शाळेकडून दुय्यम वागणूक दिली जात आहे का? खरोखर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिले जात आहे का? याचीही तपासणी आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काही काळानंतर केली जाणार आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई (RTE) प्रवेशाची लॉटरी काढण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या आरटीई प्रवेशाच्या वेळी त्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी अत्यंत बारकाईने करण्याच्या सूचना दिल्या जातील. त्याचबरोबर आरटीई प्रवेश प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे राबवली जात आहे. मात्र, तरीही कोणी या व्यवस्थेबद्दल भ्रम निर्माण करत असेल तर अशा बाबी लक्षात आणून द्यावात. त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल,असा स्पष्ट इशारा राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी 'एज्युवार्ता'शी बोलताना दिला.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी शुक्रवार (दि.७ जून)रोजी पुण्यातील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या सभागृहात शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन सोडत काढण्यात आली आली.यावेळी सुरज मांढरे बोलत होते.या प्रसंगी राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक नंदकूमार बेडसे आदी उपस्थित होते.
मांढरे म्हणाले,विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर त्यांना शाळेकडून दुय्यम वागणूक दिली जात आहे का? खरोखर विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिले जात आहे का? याचीही तपासणी आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काही काळानंतर केली जाणार आहे.
शरद गोसावी म्हणाले, आरटीईबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे.न्यायालयाने १२ जून रोजी निकाल प्रसिद्ध करण्यास सांगितला तर लगेचच १२ जूनला संध्याकाळी किंवा १३ जून रोजी सकाळी निकालाची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. यात प्रवेश यादी (admission list ) आणि प्रतीक्षा यादी (waiting list ) दोन्ही एकाच वेळेला प्रसिद्ध केल्या जातील.त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात येईल. तसेच शिक्षण विभागाने प्रत्येक शहरात तपासणी समिती नियुक्त केली आहे. गट शिक्षण अधिकारी किंवा प्रशासन अधिकारी विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश निश्चित करणार आहेत. शाळेने प्रवेश निश्चित करायचे नाहीत.प्रवेश निश्चित केल्यावर विद्यार्थ्यांना थेट शाळेत जाऊन प्रवेश घ्यायचा आहेत.
दरम्यान, गेल्या वर्षी साधारण ८,८०० शाळा आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. तर ८६,००० विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश मिळाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा अधिक म्हणजेच ९ हजार २१७ शाळांनी नोंदणी केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला असून २ लाख ४२ हजार ८७९ इतक्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.परंतु, प्रवेशासाठी १ लाख ५ हजार ३९९ जागा उपलब्ध असून या जागांवर विद्यार्थ्यांना आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.