State Government Decision : राज्य सरकारचा मोठा निर्णय : सर्व शाळांमध्ये 'सखी सावित्री' समिती स्थापन करण्याच्या सुचना
राज्यात बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क :
State Government Sakhi Savitri Committee News : राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर 'सखी सावित्री' समिती स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवण्यात आले आहे.
बालहक्क संरक्षण कायद्यानुसार सर्वच बालकांच्या हिताचे/ हक्कांचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीत मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर मुला-मुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले आहेत. पालकांच्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुला-मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच राज्यात बालविवाहांचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचेही या पत्रात नमुद करण्यात आले आहे.
हेही वाचा : Teacher Recruitment News : आश्रम शाळेत 282 पदांची भरती होणार... अतुल सावेंची मोठी घोषणा
घर, शाळा (Schools) आणि समाजात मुला-मुलींना सुरक्षित व बालस्नेही वातावरण मिळावे, तसेच त्यांचे सामाजिक, भावनिक, अध्ययन उत्तमरित्या व्हावे, यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विविध स्तरावर समित्या गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर 'सखी सावित्री' समितीचे गठन करण्याबाबत राज्य सरकारने निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक शाळेला संदर्भिय शासन निर्णयानुसार आपल्या स्तरावर समितीची स्थापन करावी लागणार आहे. तसेच समितीचा अहवाल कार्यालयास पाठवण्याच्या सुचनाही विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिलेल्या आहेत.