ILS लॉ कॉलेजमध्ये रॅगिंग:पाच विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल 

होस्टेलच्या रूमचा दरवाजा बंद असताना त्यावर अंडी फोडणे, सार्वजनिकपणे शिव्या देणे, लाईट बंद करून शिव्या देणे, अशा पद्धतीने मला त्रास देत होते. रूमचा दरवाजा बंद करून ठेवत असत आणि मला नैसर्गिक विधीसाठी सुद्धा जाऊ देत नव्हते.

ILS लॉ कॉलेजमध्ये रॅगिंग:पाच विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील नामांकित आयएलएस विधी (ILS LAW) महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विरोधात रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सुमारे वर्षभरापूर्वी केलेल्या तक्रारीनंतर चार विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार विद्यार्थ्याने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे रॅगिंग प्रकरणी लेखी तक्रार दिल्यानंतर आणि पोलिसांकडे मागणी केल्यानंतर या गुन्ह्याची नोंद झाली आहे. परंतु, कॉलेज प्रशासना विरोधातही कारवाई व्हावी, अशी तक्रारदार विद्यार्थ्यांची मागणी आहे. 

रॅगिंगबाबत केंद्र व राज्य शासनाचे अत्यंत कठोर कायदे आहेत.त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला रॅगिंग विरोधात सर्व नियमावलीची माहिती करून दिली जाते. मात्र,तरीही कायद्याचे शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डेक्कन पोलिसांनी याप्रकरणी चार विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आदित्य सिंग, सुमित गायकवाड, राजवंश देशमुख, स्वराज्य गायकवाड, उज्वल राज, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी विद्यार्थ्यांची नावे आहेत.

तक्रारदार विद्यार्थ्यांनी 'एज्युवार्ता' शी बोलताना सांगितले, संबंधित विद्यार्थी हे मला मानसिक त्रास देत होते. होस्टेलच्या रूमचा दरवाजा बंद असताना त्यावर अंडी फोडणे, सार्वजनिक पणे शिव्या देणे, लाईट बंद करून शिव्या देणे, अशा पद्धतीने मला त्रास देत होते. रूमचा दरवाजा बंद करून ठेवत असत आणि मला नैसर्गिक विधीसाठी सुद्धा जाऊ देत नव्हते. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांविरोधात मी कॉलेज प्रशासनाकडे ऑक्टोबर महिन्यात तक्रार केली होती. परंतु, कॉलेजने या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यानंतर डिसेंबर महिन्यात मी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे याबाबत तक्रार केली. 

पोलिसांकडे सुद्धा याबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर आता मला त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांना विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परंतु, कॉलेज प्रशासनाने योग्य वेळी माझ्या तक्रारीची दखल घेतली असती तर संबंधित विद्यार्थ्यांना समज देऊन त्यांना रोखता आले असते. मात्र, कॉलेज प्रशासनाने तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कॉलेज प्रशासन सुद्धा दोषी आहे. त्यामुळे कॉलेज प्रशासनातील दोषी पदाधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणे गरजेचे आहे,असेही तक्रारदार विद्यार्थ्याने सांगितले.