‘इनोव्हेट यू टेकॅथॉन ३.०’: सामाजिक समस्या सोडवण्यासाठी AI चा वापर व्हावा;डॉ.नितीन करमळकर यांची अपेक्षा
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांमुळे मोठे व्यासपीठ मिळत आहे. समाजातील विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी इनोव्हेशन आणि स्टार्टअप संस्कृतीची आवश्यकता असून तरुणांनी त्याकडे करिअरच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारत स्टार्टअप क्षेत्रात जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचत आहे, ही चांगली बाब आहे.मात्र, समाजाभिमुख समस्या सोडविण्यासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व्हायला हवा. त्यातून नवउद्योजक घडती याची सुरुवात हॅकेथॉन स्पर्धांमधून होते. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धांमधून पुढे यावे,अशी अपेक्षा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष व माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केली.
‘इनोव्हेशन फाउंडेशन’ आयोजित ‘इनोव्हेट यू टेकॅथॉन ३.०’ या हॅकेथॉन स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात त्यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप आणि इनोव्हेशनकडे वळण्याचे आवाहन केले. जेएसपीएम नऱ्हे शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांच्या ‘टीम ॲग्रोयंत्र’ने यंदाचे विजेतेपद पटकावले. या प्रसंगी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका मृणाल गंजाळे यांना यंदाचा ‘इनोव्हेशन पुरस्कार’ देण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र - कुलगुरू डॉ. पराग काळकर, इनोव्हेशन फाउंडेशनचे अध्यक्ष कल्पेश यादव, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश काकडे, एआयएसएसएमएस आयओआयटीचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने, तेजस यादव, प्रा. देवेंद्र ईटोळे, नरेन्द्र गडदे, प्रणव वाडकर, विलास शिंदे, निकुंज ओव्हाळ, सोहम म्हेत्रे आदी उपस्थित होते.
दाच्या इनोव्हेट यू टेकॅथॉन ३.० मध्ये ४५० संघाचे १७०० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.या विद्यार्थ्यांनी २४ तास प्रत्यक्ष काम करत दिलेल्या समस्येवर उपाय शोधले व त्यातील एकूण ४० संघांना बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेला एआयएसएसएमएस आयओआयटीचे सहकार्य लाभले आहे.
डॉ. करमळकर म्हणाले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांमुळे मोठे व्यासपीठ मिळत आहे. समाजातील विविध समस्यांवर उपाय शोधण्यासाठी इनोव्हेशन आणि स्टार्टअप संस्कृतीची आवश्यकता असून तरुणांनी त्याकडे करिअरच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे.
डॉ. गोसावी म्हणाले, स्पर्धेची वाढती व्याप्ती वाढत असून, त्यातून नवे संशोधक घडत आहे. उद्योजकतेला चालना मिळत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर समाजातील समस्या सोडविण्यासाठी व्हायला हवा. समाजाच्या गरजा लक्षात घेऊन संशोधन झाले पाहिजे, तेव्हाच तंत्रज्ञानाचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल.
डॉ. काळकर म्हणाले , इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि संगणक क्षेत्रातील बदल फार झपाट्याने होत आहे. या बदलांशी सांगड विद्यार्थ्यांनी घालत, आपले ज्ञान अपडेट ठेवायला हवे. हे तंत्रज्ञान आणि वस्तू लवकर कालबाह्य होण्याऐवजी दीर्घकाळ उपयोगात राहतील, यासाठी संशोधन होणे अत्यंत आवश्यक आहे.
कल्पेश यादव म्हणाले , विद्यार्थ्यांचे कौशल्य जगासमोर आणून त्यांना स्टार्टअपमध्ये रूपांतरित करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील आहे. यासाठी येत्या काही महिन्यांत बूटकॅम्प आयोजित करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल. यावर्षी आपत्ती व्यवस्थापन विषयात ८७ संघांनी सहभाग नोंदवला तसेच पर्यावरण विषयातही मोठ्या प्रमाणात कल्पना सादर झाल्या असून, या संकल्पनांचा उपयोग सरकारी संस्थांना व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यादव यांनी नमूद केले.
सूत्रसंचालन बालुशा माने यांनी केले. फाऊंडेशनचे सोहम म्हेत्रे, संकेत बारटक्के, सुरेश वेताळ, कौस्तुभ रेडेकर, निनाद फुटाणे आदींनी मोलाची भूमिका बजावली.
......
टीम ॲग्रोयंत्रने २ लाखांचे प्रथम पारितोषिक पटकाविले
इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित इनोव्हेट यू टेकाथॉन ३.० स्पर्धेचे यंदाच्या तिसऱ्या वर्षी स्पर्धेत टीम ॲग्रोयंत्रने प्रथम, व्हीआयटी महाविद्यालयाच्या टीम टर्मिनल एक्सने द्वितीय, तृतीय क्रमांक एआयएसएसएमएस आयओआयटीच्या टीम हॅलो ओएस यांनी पटकावला. यावेळी सर्वोत्तम कल्पक प्रकल्पाचे बक्षीस जेसीपीएमच्या टीम गोवर्धनने जिंकले. सर्वोत्तम एआयचा वापर करणारी टीम व्हीआयटीची टीम ड्रीमर्स ठरली. यावेळी विजेत्या संघास २ लाख रुपयांचे रोख बक्षीस, द्वितीय व तृतीय संघास अनुक्रमे १ लाख व ७५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. सर्वोत्तम एआयचा वापर व कल्पक प्रकल्पाच्या विजेत्यांना २५ हजारांची दोन बक्षिसे देण्यात आली.
मृणाल गंजाळे यांना ‘इनोव्हेशन पुरस्कार’ प्रदान
शिक्षण क्षेत्रात नवमाध्यमांच्या माध्यमातून उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी ‘इनोव्हेशन पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. यंदाचा पुरस्कार राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका मृणाल गंजाळे यांना प्रदान करण्यात आला. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव म्हाळुंगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील त्या शिक्षिका आहेत. नाविन्यपूर्ण कल्पनांच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिक्षण सोपे होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.