सरकारी अनास्थेमुळे मराठी शाळा बंद पडताहेत: प्रा मिलिंद जोशी                  

महासत्तेचे स्वप्न साकार होण्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षणाचा दर्जा सुधारणे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थी किती आहेत  याचा विचार न करता प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळाले पाहिजे,अशी भूमिका असली पाहिजे.

सरकारी अनास्थेमुळे मराठी शाळा बंद पडताहेत: प्रा मिलिंद जोशी                  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

" आपली भाषा आपल्या संस्कृतीची निदर्शक असते. मराठी संस्कृती टिकायची असेल तर मराठी भाषा टिकली पाहिजे. मराठी भाषा टिकावी,असे वाटत असेल तर मराठी शाळा उत्तम चालल्या पाहिजेत. सरकारी अनास्थेमुळे मराठी शाळा बंद पडताहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे", असे मत प्रसिद्ध लेखक व वक्ते प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.

पुणे माध्यमिक शाळा शिक्षकेतर सहकारी पतपेढीतर्फे आयोजित पुरस्कार वितरण व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात प्रा.मिलिंद जोशी बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण महामंडळाचे सचिव ॲड. संग्राम कोंडे देशमुख, शिक्षकेतर सहकारी पतपेढीचे अध्यक्ष शिवाजी खांडेकर, सचिव देवेंद्र पारखे, उपाध्यक्ष प्रसन्न कोतुळकर, खजिनदार सुनील पदम, पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष विनोद गोरे,  मुख्याधापिका सुपनेकर आदी उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक  सेवा गौरव पुरकार  प्रशासन अधिकारी राजेंद्र साठे यांना, का. रा.  वैशंपायन शिक्षकेतर पुरस्कार अरुणा ताम्हाणे यांना तर रा.ब. पाटणकर शिक्षकेतर पुरस्कार गीता कराडकर, वर्षाराणीजेधे , इरफान झारेकरी, प्रमोद सवाने व गणेश कदम यांना प्रदान करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सत्कार आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. 

प्रा.जोशी म्हणाले, महासत्तेचे स्वप्न साकार होण्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील शिक्षणाचा दर्जा सुधारणे खूप महत्त्वाचे आहे. विद्यार्थी किती आहेत  याचा विचार न करता प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळाले पाहिजे,अशी भूमिका असली पाहिजे. पटसंख्या या निकषाने शिक्षण क्षेत्राचे अपरिमित नुकसान केले आहे. शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकां इतकेच शिक्षकेतर सेवकांचे योगदान मोलाचे आहे. शिक्षकेतर सेवक विरहित शाळा ही कल्पनाच आपण करू शकत नाही. सध्या शिक्षकांवरील अशैक्षणिक जबाबदाऱ्यांमुळे शिक्षणाची गुणवत्ता खालावत असून शिक्षकांना शिकविण्यासाठी वेळच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिक्षकेतर सेवकांच्या भरतीकडे सरकारचे दुर्लक्ष असल्यामुळे त्यांची कामे देखील शिक्षकांनाच करावी लागत आहेत हे चित्र दुर्दैवी आहे. शिक्षणाकडे दुर्लक्ष करणारे राष्ट्र कधीही विकसित होऊ शकत नाही.

माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. अद्ययावत वाटणारी प्रत्येक गोष्ट झपाट्याने कालबाह्य होत आहे. अशा काळात बौद्धिक पाट्या टाकणाऱ्यांचे भवितव्य अंध:कारमय आहे, असे नमूद करून मिलिंद जोशी म्हणाले, इथून पुढच्या काळात केवळ पदव्या आहेत म्हणून नोकऱ्या मिळतील अशी परिस्थिती राहिलेली नाही. पदवीधरांना आपली गुणवत्ता आणि उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. 

शिवाजी खांडेकर म्हणाले,  शिक्षकेतर भरती बंदबाबत  गेल्या  20-22 वषापासून शाळांमध्ये लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल,  शिपाई भरती नाही. यामुळे शाळेची स्वछता, ग्रंथालय, लॅब कशी सांभाळणार? प्रशासकीय कामात अनेक अडथळे निर्माण होत आहेत. अनेक शाळांमध्ये शिक्षकांना ही कामे करावी लागत आहेत. पवित्र प्रणालमुळे गेल्या 5 वर्षात गणित, विज्ञान, इंग्रजीचे शिक्षक मिळाले  नाहीत. शाळेचं लाईट बिल भरायला देखील अनुदान नाही, त्यामुळे त्यामुळे या सर्व गंभीर प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया निघोजाकर यांनी केले तर सुभाष तांबे यांनी आभार मानले.