‘वारी पर्यावरणाची… वृक्षारोपणाची!’ उपक्रमातून भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी पूजनाने झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात आणि अभंगांच्या सुरेल स्वरांत विद्यार्थ्यांनी पालखीची मिरवणूक काढली.

‘वारी पर्यावरणाची… वृक्षारोपणाची!’ उपक्रमातून भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळा, बारामती येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने "वारी पर्यावरणाची… वृक्षारोपणाची!" या अभिनव संकल्पनेवर आधारित पालखी सोहळा आणि वृक्षारोपण उपक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. भक्ती, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी पूजनाने झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात आणि अभंगांच्या सुरेल स्वरांत विद्यार्थ्यांनी पालखीची मिरवणूक काढली. वारकरी वेशातील विद्यार्थी, भगवे ध्वज, तुळशीवृंदावन आणि हरिनामाच्या गजरामुळे संपूर्ण परिसर पंढरीमय झाला.

पालखी मिरवणूक रेल्वे स्टेशनच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर पारंपरिक रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर कन्या शाळेत पालखीचे पूजन करण्यात आले. पुढे शाळेच्या मैदानावर दुसरे रिंगण आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग गायनाने उपस्थितांची मने जिंकली.

पालखी सोहळ्यानंतर "एक विद्यार्थी – एक वृक्ष" या संकल्पनेतून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात ११ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमात १९ माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी वृक्षांचे संगोपन करण्याची शपथ घेत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी, "जशी वारी भक्तीची, तशीच वारी पर्यावरणाची; प्रत्येकाने एक वृक्ष लावून पृथ्वीला हिरवाईची भेट देऊया," असा प्रेरणादायी संदेश दिला. संतांच्या निसर्गप्रेमाचा आणि पर्यावरण संरक्षणाचा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकार करत या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली.

कार्यक्रमाची सांगता विठ्ठलाच्या आरतीने आणि प्रसाद वितरणाने झाली. या प्रसंगी पूर्व-प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक, माजी विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा समितीचे अध्यक्ष अजय पुरोहित तसेच महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांचे प्रेरणा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभल्याचे आयोजकांनी सांगितले.