म.ए.सो. मुलांचे विद्यालयात दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या तसेच ८० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पेढे देऊन सत्कार करण्यात आला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मुलांचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न झाला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समितीचे महामात्र सुधीर गाडे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसेनजीत फडणवीस तसेच पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक अनिल मस्के यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी शाल, विद्यार्थ्यांनी तयार केलेला पर्यावरणपूरक पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापक सायसिंग वसावे यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील दहावी व बारावीच्या परीक्षांतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशाचा गौरव करत, हा गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांना आगामी वाटचालीसाठी प्रेरणा, ऊर्जा आणि प्रोत्साहन देणारा असल्याचे सांगितले.
यावेळी इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या तसेच ८० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पेढे देऊन सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या मनोगत सत्रात दहावीतील चैतन्य शिंदे, चैतन्य हगवणे तसेच कर्णबधिर विभागातील श्रेयस शिंदे यांनी शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. बारावीतील भावेश ढोले याने आपल्या यशामागील शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेची शिस्त आणि विशेष मार्गदर्शन वर्गांचे योगदान अधोरेखित करत शाळेप्रती आभार व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे प्रसेनजीत फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेच्या युगात परकीय भाषा आणि कौशल्य शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगत, किमान एक परकीय भाषा आणि एखादे कौशल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. तर जगन्नाथ लकडे यांनी खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत, क्रीडा क्षेत्रातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे नमूद केले. योगाभ्यासाचे महत्त्वही त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

अध्यक्षीय समारोपात सुधीर गाडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात मनापासून काम करण्याचा, मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने परिश्रम घेण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमास उपमुख्याध्यापिका मार्गसिद्धा पवार, पर्यवेक्षिका रसिका लिमये, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, दहावी-बारावीचे विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.