स्त्री साक्षरता : अज्ञानरूपी अंधःकाराविरुद्धची सामूहिक लढाई..
स्त्री साक्षर झाली की ती केवळ आपले आयुष्य उजळवत नाही, तर कुटुंबाचा पाया मजबूत करते, मुलांना संस्कार देते, आर्थिक स्वावलंबनाची वाट उघडते, अन्यायाविरुद्ध आवाज उठवते. तिच्या हातातील ज्ञानदीप घरापुरता मर्यादित राहत नाही, तो गाव उजळवतो, समाज उजळवतो, राष्ट्र उजळवतो.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
"जागा झाला सूर्य नभात,
ज्ञानदीप लावा अंतरी,..
स्त्री झाली साक्षर जेव्हा,
तेव्हा फुले समाजश्री."
८ सप्टेंबर हा जागतिक साक्षरता दिन (World Literacy Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे अक्षरांचा उत्सव, प्रकाशाचा सोहळा आणि अज्ञानरूपी अंधःकाराविरुद्धची सामूहिक लढाई. जगभर लाखो-कोट्यवधींच्या ओठांवर आज आशेची एकच ज्योत पेटलेली आहे. ती म्हणजे ज्ञानाची! पण हाच प्रकाश जेव्हा समाजाच्या अर्ध्या भागाला म्हणजे स्त्रीला पूर्णत्वाने (Women's Education) मिळत नाही, तेव्हा हा उत्सव अपूर्ण राहतो. “जगाचा अर्धा भाग स्त्री आहे, पण तिच्या हातातील अर्धवट पेटलेला दिवा अजूनही पूर्ण उजेड देत नाही,”
सन २०११ च्या जनगणनेतील आकडे धक्कादायक वास्तव सांगतात. भारताची लोकसंख्या १२१ कोटी, त्यापैकी ५८.६४ कोटी स्त्रिया, पण साक्षर केवळ ३९.६ कोटी. स्त्री साक्षरतेचे प्रमाण ६५.४६%, तर पुरुषांचे ८२.१४%. आकड्यांच्या थंड ओळीतूनही जळजळते सत्य उमटते स्त्रिया अजूनही शिक्षणाच्या प्रवासात मागे आहेत. त्या जनगणनेत सुमारे २४ कोटी ८२ लाख निरक्षर होते. त्यानंतर साक्षर भारत आणि पढना लिखना योजनांमुळे काही बदल झाला असेल, तरीही आजही देशभर सुमारे १८ कोटी लोक अज्ञानाच्या अंधारात आहेत. २०११ नंतर जनगणना न झाल्याने अचूक चित्र आपल्याला माहीत नाही, पण निरक्षरतेची सावली अजूनही घोंगावत आहे.
महाराष्ट्राचे चित्रही फार वेगळे नाही. ११.२ कोटी लोकसंख्येत ५.४ कोटी स्त्रिया. त्यापैकी साक्षर ३.५ कोटी. स्त्री साक्षरता प्रमाण ७५.८७% राष्ट्रीय सरासरीपेक्षा थोडे अधिक, पण पुरुषांच्या तुलनेत मोठी दरी कायम. २०११ मध्ये १५ वर्षांवरील असाक्षरांपैकी ५३ लाख पुरुष आणि तब्बल १ कोटी १० लाख स्त्रिया होत्या. म्हणजेच १ कोटी ६३ लाखांचे असाक्षरतेचे ओझे महाराष्ट्राने वाहिले. या प्रत्येक आकड्याच्या मागे थांबलेले आयुष्य, विझलेली स्वप्ने आणि न उमललेली जीवनफुले दडलेली आहेत.
स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक मोहीम हाती घेतल्या राष्ट्रीय साक्षरता अभियान, सर्व शिक्षा अभियान, साक्षर भारत अभियान आणि आजचा उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम. महाराष्ट्रात साक्षर भारत ही योजना दहा जिल्ह्यांत राबवली गेली, जिथे स्त्री असाक्षरता ५०% पेक्षा अधिक होती. काही बदल झाला, काही महिलांनी प्रकाशाचा स्पर्श अनुभवला, पण त्याचे अचूक चित्र नाही. मात्र उल्लास कार्यक्रमात नवा दीप उजळतो आहे. कारण इथे केवळ वाचन-लेखन नव्हे, तर डिजिटल साक्षरता, आर्थिक व्यवहार, आरोग्य-जागरूकता, जीवनकौशल्ये आणि पर्यावरणाची जाणीव यांचा समावेश आहे. हा खरा “आधुनिक युगातील शहाणी माता” घडविण्याचा मार्ग आहे.
या प्रयत्नांचे फळही आता दिसू लागले आहे. मार्च २०२४ मध्ये झालेल्या परीक्षेत १.३० लाख पुरुष आणि २.९५ लाख स्त्रिया उत्तीर्ण होऊन ४.२५ लाख जण साक्षरतेच्या प्रवासात सामील झाले. तर मार्च २०२५ मध्ये ही संख्या आणखी झेपावली. १.८८ लाख पुरुष आणि तब्बल ४.८० लाख स्त्रिया, असे मिळून ६.६७ लाख जणांनी ज्ञानदीप प्रज्वलित केला. या आकड्यांतून असे दिसते की स्त्रिया उत्साहाने पुढे सरसावत आहेत. जणू दीर्घकाळ अंधारात ठेवलेल्या डोळ्यांना आता पहाटेचा प्रकाश भिडतो आहे.
भारतीय समाजसुधारकांचा संघर्ष इथे आठवला की मन आदराने नतमस्तक होते. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली, अंधश्रद्धेला आणि रूढींना आव्हान दिले. सावित्रीबाईंची शिकवण “विद्येचे दान हेच खरे दान.” महात्मा गांधींचे ठाम मत “स्त्री शिक्षणाशिवाय समाजाचा उत्थान होऊ शकत नाही.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात महिलांच्या शिक्षणाचा हक्क दिला. महर्षी कर्वे हे आयुष्यभर स्त्री शिक्षणासाठी झगडले. या महापुरुषांनी समाजाच्या आकाशात ज्ञानताऱ्यांची मालिका उजळवली, पण अजूनही अर्धा आकाश अंधारात आहे.
स्त्रिया अधिक असाक्षर राहिल्या, त्यामागील कारणे खोलवर रुजलेली आहेत. लिंगभेद, लवकर लग्नाच्या प्रथा, आर्थिक विषमता, शाळा व साधनांची कमतरता, आणि सर्वात भयंकर म्हणजे शिक्षणाबाबतची उदासीन मानसिकता. ही बेडी तोडली नाही, तर विकासाची वाट काटेरीच राहील. यातून बाहेर पडण्याचे उपायही स्पष्ट आहेत. प्रत्येक मुलीसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण, कन्या शाळा व वसतिगृहे, शिष्यवृत्ती योजना, स्वयंसेवी संस्था व ग्रामसभांचा सहभाग, डिजिटल शिक्षण आणि ई-लर्निंगचा प्रभावी वापर. या वाटेवर चालल्यास स्त्री साक्षरता केवळ आकडेवारीत वाढणार नाही, तर समाजाचा पाया भक्कम होईल.
कारण स्त्री साक्षर झाली की ती केवळ आपले आयुष्य उजळवत नाही, तर कुटुंबाचा पाया मजबूत करते, मुलांना संस्कार देते, आर्थिक स्वावलंबनाची वाट उघडते, अन्यायाविरुद्ध आवाज उठवते. तिच्या हातातील ज्ञानदीप घरापुरता मर्यादित राहत नाही, तो गाव उजळवतो, समाज उजळवतो, राष्ट्र उजळवतो.
मराठी कवितेतही हेच प्रतिध्वनित झाले आहे –
“दे तिला अक्षरांचे दान,
फुलेल तिचे आयुष्य महान;
जगाच्या पाठीवर उजळेल,
साक्षर स्त्रीचे सुंदर भान.”
युनेस्कोने १९६६ साली ८ सप्टेंबर हा दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून घोषित केला. उद्दिष्ट एकच – निरक्षरतेचा अंधार दूर करणे आणि शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे. आज डिजिटल युगात साक्षरतेचे नवे पैलू आहेत. पारंपरिक वाचन-लेखनाबरोबरच माहिती साक्षरता, डिजिटल साक्षरता, आर्थिक व आरोग्य साक्षरता, माध्यम साक्षरता आणि सामाजिक-सांस्कृतिक साक्षरता आवश्यक ठरतात. हे सर्व प्रकार मिळून स्त्रीला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर आणि सक्षम करतात.
म्हणूनच स्त्री साक्षरतेचा प्रश्न हा केवळ शिक्षणाचा नाही, तर समानतेचा, सन्मानाचा आणि अस्तित्वाचा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास ध्येयांत “सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण” हे महत्त्वाचे स्थानही याच कारणासाठी आहे. स्त्रीला ज्ञान दिले की ती घराला दिशा देते, समाजाला बळ देते, राष्ट्राला सामर्थ्य देते.
आज जागतिक साक्षरता दिनानिमित्त आपण सर्वांनी एकच संकल्प करायला हवा –
“प्रत्येक मुलगी शाळेत, प्रत्येक स्त्री साक्षर,
हा प्रकाशाचा मार्ग, हीच प्रगतीची दिशा.”
लेखक - राजेश क्षीरसागर, शिक्षण सहसंचालक