दृष्टिहीन विद्यार्थ्यांची ऐतिहासिक कामगिरी; स्वतः टाईप करून दहावीत मिळवले 91 टक्के गुण
दृष्टिहीन विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून बोर्ड परीक्षा देताना लेखनिकांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर दुसऱ्या व्यक्तीच्या वेग, समज आणि लेखनशैलीचा प्रभाव पडत असे. मात्र सनथ आणि शौर्य यांनी ही पारंपरिक पद्धत मोडीत काढत स्वतः प्रश्नपत्रिका सोडवून नवा आदर्श निर्माण केला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुण्यातील दृष्टिहीन विद्यार्थी सनथ देशपांडे आणि शौर्य गावळी यांनी कोणत्याही लेखक किंवा सहाय्यकाविना स्वतः टाईप करून दहावीची बोर्ड परीक्षा दिली. चालू शैक्षणिक वर्षात पुण्यातील असे ते पहिले दृष्टिहीन विद्यार्थी ठरले आहेत, की ज्यांनी स्वतंत्रपणे SSC बोर्ड परीक्षा पूर्ण केली.त्यात सनथ देशपांडे याने 91 टक्के तर शौर्य गावळी याने ७३.८० टक्के गुण प्राप्त केले.
दृष्टिहीन विद्यार्थ्यांना अनेक वर्षांपासून बोर्ड परीक्षा देताना लेखनिकांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर दुसऱ्या व्यक्तीच्या वेग, समज आणि लेखनशैलीचा प्रभाव पडत असे. मात्र सनथ आणि शौर्य यांनी ही पारंपरिक पद्धत मोडीत काढत स्वतः प्रश्नपत्रिका सोडवून नवा आदर्श निर्माण केला आहे.
या यशामागे ‘स्वलेखन'' टायपिंग ट्यूटर’ या सुलभ बहुभाषिक टायपिंग प्रणालीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. उमा बडवे यांनी निवांत अंध मुक्त विकासालयात विकसित केलेली ही भारतातील एकमेव सुलभ टायपिंग ट्यूटर प्रणाली मानली जाते.
शौर्य गावळीने पाचवीत असतानाच टायपिंगचे प्रशिक्षण सुरू केले, तर सनथ देशपांडेने आठवीपासून सरावाला सुरुवात केली. अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्ध सरावातून त्यांनी टायपिंगचा वेग वाढवला, चुका कमी केल्या आणि ‘स्वलेखन'' टेस्ट’ या विशेष सुलभ परीक्षा प्रणालीवर नियमित सराव परीक्षा दिल्या.त्यांचे हे यश केवळ शैक्षणिक कामगिरी नसून महाराष्ट्रातील दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी स्वावलंबन, आत्मविश्वास आणि शैक्षणिक स्वातंत्र्याचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि सुलभ तंत्रज्ञानाच्या मदतीने दृष्टिहीन विद्यार्थीही पूर्णपणे स्वतंत्रपणे शिक्षण घेऊ शकतात, हे सनथ आणि शौर्य यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.