दहावीत राज्यातील 179 विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण; राज्याचा निकाल 92.9 टक्के, मुली आघाडीवर
कोकण विभाग निकालात आघाडीवर असून छत्रपती संभाजी नगरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.96 एवढे असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.56% एवढी आहे. राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 64 विषयांपैकी 20 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल 92.9% लागला आहे. त्यात राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले असून त्यात लातूर विभागातील सर्वाधिक 104 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नेहमीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी 5.40 ने जास्त आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 2.1 टक्क्याने निकाल घटना आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदा कोकण विभाग निकालात आघाडीवर असून छत्रपती संभाजी नगरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.96 एवढे असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.56% एवढी आहे. राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या 64 विषयांपैकी 20 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
निकालात कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर असून कोल्हापूर दुसऱ्या, मुंबई तिसऱ्या, पुणे चौथ्या, नाशिक पाचव्या ,अमरावती सहाव्या, नागपूर सातव्या, लातूर आठव्या आणि छत्रपती संभाजी नगर नव्या क्रमांकावर आहे.
परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या 15,42,472 विद्यार्थ्यांपैकी चार लाख 22 हजार 851 विद्यार्थ्यांनी 75 टक्के व त्यापेक्षा अधिक टक्के गुण मिळवले आहेत. 60 टक्के व त्यापुढील टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 4 लाख 82 हजार 264 आहे. तसेच 45% व त्यापुढे गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 80,437 आहे.
गेल्या चार वर्षातील सर्वात कमी निकाल
राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल हा गेल्या चार वर्षाचा विचार करता सर्वात कमी आहे. 2023 मध्ये दहावीचा निकाल 93.83% होता 2024 मध्ये तो 95.81% होता 2025 मध्ये तो 94. 10% झाला त्यानंतर आता 2026 मध्ये दहावीचा निकाल 92.9% पर्यंत खाली घसरला आहे.