रानभाज्या आणि भरडधान्य महोत्सवातून जैवविविधता, पोषण आणि परंपरेचा जागर
प्रदर्शनामध्ये आंबोशी, चाकवत, अंबाडी, रानभेंडी, कर्टुलं, सराटा, मटारु, पाथरी, चिवळ, घोळ, वाघाटे, शिंदाडमाकड, खडकशेपू, आघाडा, माठ, आंबट चुका, कुंजीर, तांदूळजा, कुरडू, हदगा, अळंबी, केना, अळू, गुळवेल, टाकळा आदी विविध रानभाज्यांचा समावेश होता.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित "रानभाज्या व भरडधान्य महोत्सव–२०२६" उत्साहात पार पडला. या महोत्सवात ९२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ६१ प्रकारच्या रानभाज्या तसेच ३० प्रकारच्या भरडधान्ये व गावरान कडधान्यांचे आकर्षक प्रदर्शन सादर केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी जैवविविधता, पारंपरिक अन्नसंस्कृती आणि पोषणमूल्यांविषयी जागरूकतेचा प्रभावी संदेश दिला.
प्रदर्शनामध्ये आंबोशी, चाकवत, अंबाडी, रानभेंडी, कर्टुलं, सराटा, मटारु, पाथरी, चिवळ, घोळ, वाघाटे, शिंदाडमाकड, खडकशेपू, आघाडा, माठ, आंबट चुका, कुंजीर, तांदूळजा, कुरडू, हदगा, अळंबी, केना, अळू, गुळवेल, टाकळा आदी विविध रानभाज्यांचा समावेश होता. तसेच भगर, वरई, राळ, नाचणी, सावा, राजगिरा, बाजरी, ज्वारी, मूग, मटकी, उडीद, चवळी, वाटाणा, हरभरा आदी भरडधान्ये व गावरान कडधान्यांचेही प्रदर्शन मांडण्यात आले.
रानभाज्या आणि भरडधान्यांपासून तयार केलेल्या पौष्टिक, स्वादिष्ट आणि पारंपरिक पाककृतींनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी आणि नागरिकांनी विविध रानभाज्या, भरडधान्ये व गावरान कडधान्यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेत उपक्रमाचे कौतुक केले.

या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी केवळ प्रदर्शन सादर न करता आपल्या परिसरातील जैवविविधतेचा अभ्यास केला, विस्मृतीत गेलेल्या अन्नपरंपरेचे दस्तऐवजीकरण केले, विविध वनस्पतींच्या पोषणमूल्यांचा अभ्यास करून त्यापासून तयार होणाऱ्या पारंपरिक व पौष्टिक पाककृती समाजासमोर मांडल्या. परंपरा आणि आधुनिक विज्ञानाचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्ती, पर्यावरण संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला.
हवामान बदल, कुपोषण आणि जीवनशैलीजन्य आजारांसारख्या जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर रानभाज्या, भरडधान्ये आणि गावरान कडधान्यांचा आहारात समावेश वाढविणे ही काळाची गरज असल्याचा संदेश या महोत्सवातून देण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी.मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव पार पडला. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ. अयोध्या क्षीरसागर, वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. एन. एम. घनगावकर, उपप्राचार्य प्रा. एच. एस. जाधव, वनस्पतिशास्त्र विभागासह इतर विभागांतील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिश्रमपूर्वक सहभाग नोंदविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.