मुंबई विद्यापीठ! 'या' तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशाची शेवटची संधी; परिपत्रक जारी

गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देऊनही काही जागा रिक्त राहिल्यास संबंधित महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर गुणवत्ता यादी जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रवेशित करावे. आता १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत समर्थ पोर्टलवर ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

मुंबई विद्यापीठ! 'या' तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशाची शेवटची संधी; परिपत्रक जारी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) पदवी, पदव्युत्तर आणि चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांच्या (Undergraduate, postgraduate, and four-year degree courses) प्रवेश प्रक्रियेला पुन्हा एकदा मुदतवाढ (Extension of admission process) दिली आहे. विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग, संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत (Admission process ends on August 12th) पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यापक हिताचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे (Dr. Pooja Raundle) यांनी परिपत्रक जारी (Circular issued) करत ही माहिती दिली.

गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देऊनही काही जागा रिक्त राहिल्यास संबंधित महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर गुणवत्ता यादी जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रवेशित करावे. आता १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत समर्थ पोर्टलवर ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. विद्यापीठाने निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार ही अंतिम मुदतवाढ असून विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी करण्याची ही शेवटची संधी ठरणार आहे.

चारही विद्याशाखेतील विविध विषयांचा समावेश असलेली ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि पारदर्शक आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांनी muugadmission.samarth.edu.in तर पदव्युत्तर आणि चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमांसाठी muadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर प्रवेशपूर्व नावनोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच ज्या महाविद्यालयात प्रवेश हवा आहे, तेथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरणेही आवश्यक आहे.

विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना काटेकोरपणे हे वेळापत्रक पाळण्याचे आवाहन केले आहे. रिक्त राहिलेल्या जागांसाठी महाविद्यालये स्वतःच्या स्तरावर गुणवत्ता यादी जाहीर करून प्रवेश निश्चित करतील, असे डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शेवटची संधी मिळाली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या या निर्णयाने प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळेत ऑनलाईन नावनोंदणी पूर्ण करून इच्छित महाविद्यालयात अर्ज करावा. अधिक माहितीसाठी अधिकृत समर्थ पोर्टल आणि विद्यापीठाचे परिपत्रक तपासावे, असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.