मुलांचे पालक-मालक न होता विश्वस्त व्हा : गिरीजा लिखिते
"पालकत्व ही केवळ जबाबदारी नसून आनंदाने जगण्याची एक कला आहे," असे सांगत मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद, शिस्तीसोबत प्रेम, मोबाईलचा मर्यादित वापर आणि अभ्यासाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
"मुलांचे पालक-मालक न होता त्यांच्या आयुष्याचे विश्वस्त बना. मुलांवर मालकी गाजविण्याऐवजी त्यांना योग्य संस्कार, प्रेम आणि विश्वासाची साथ द्या," असे प्रतिपादन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या व्यक्तिमत्व विकास केंद्राच्या समन्वयक गिरीजा लिखिते यांनी केले.
म. ए. सो. सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेत पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या पालकांसाठी "पालकत्व" या विषयावरील विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ. प्रतिभा कदम यांनी प्रास्ताविक करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला व त्यांचे स्वागत केले.
मार्गदर्शन करताना गिरीजा लिखिते यांनी "पालकत्व ही केवळ जबाबदारी नसून आनंदाने जगण्याची एक कला आहे," असे सांगत मुलांशी मैत्रीपूर्ण संवाद, शिस्तीसोबत प्रेम, मोबाईलचा मर्यादित वापर आणि अभ्यासाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात घर आणि शाळा यांचा समन्वय अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून पटवून दिले. तसेच पालकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
या कार्यशाळेला पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील १०८ पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला. कार्यक्रमात पालकांनी मार्गदर्शनाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा समितीचे अध्यक्ष अजय पुरोहित तसेच शाळा समितीचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सौ. जयश्री लोंढे यांनी केले.
पालकांच्या विचारांना नवी दिशा देणारी आणि प्रभावी पालकत्वाची जाणीव करून देणारी ही कार्यशाळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली.