पात्र उमेदवारांच्या हाती प्राध्यापक भरतीचे गाजर? NOC मिळेनात..
पुणे जिल्ह्यातील एका विधी महाविद्यालयाला आणि नाशिक जिल्ह्यातील एका अल्पसंख्यांक महाविद्यालयाला एनओसी देण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे विभागातील केवळ दोन महाविद्यालयांना एनओसी दिल्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण कशी होणार ?
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे महाविद्यालयांमधील 5 हजाराहून अधिक प्राध्यापकांच्या रिक्त पदाची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र अजूनही या भरती प्रक्रियेस गती मिळालेली नाही. आत्तापर्यंत पुणे विभागातील केवळ दोन महाविद्यालयांना एनओसी देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सुद्धा प्राध्यापकांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी शासनाकडून पात्र उमेदवारांना केवळ प्राध्यापक भरतीचे गाजर दाखवले जात असल्याचे बोलले जात आहे.
राज्याच्या उच्च शिक्षण विभागातर्फे राज्यातील सर्व शासकीय विद्यापीठातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. काही विद्यापीठांनी भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची भरती प्रक्रिया सुरू असून ज्या पदांसाठी अधिक अर्ज आले आहेत, अशा पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. दरम्यान, विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून ही भरती प्रक्रिया राबवली जात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे न्यायालयाचा आरक्षण विषयक याचिके संदर्भात काय निर्णय लागतो ? यावर विद्यापीठाच्या प्राध्यापक भरतीचे भवितव्य अवलंबून आहे.
राज्यातील विविध विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या पाच हजाराहून अधिक जागांची भरती जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राज्य शासनातर्फे ठेवण्यात आले होते. परंतु ऑगस्ट महिना उजाडला तरीही अद्याप महाविद्यालयांना भरती बाबत एनओसी प्राप्त झाल्या नाहीत. शासनातर्फे भरतीसाठी रोस्टर तपासणी व इतर बाबींसाठी पोर्टल तयार करण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु अजूनही एनओसी देण्याची प्रक्रिया संथ गतीने होत असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालया अंतर्गत पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. प्रामुख्याने राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या तीन जिल्ह्यांमध्ये महाविद्यालयांची संख्या मोठी आहे. परंतु, पुणे जिल्ह्यातील एका विधी महाविद्यालयाला आणि नाशिक जिल्ह्यातील एका अल्पसंख्यांक महाविद्यालयाला एनओसी देण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे विभागातील केवळ दोन महाविद्यालयांना एनओसी दिल्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत रिक्त पदांची भरती प्रक्रिया पूर्ण कशी होणार ? असा प्रश्न निर्माण होतो.
राज्य शासनाने अध्यादेश प्रसिद्ध करून भरती प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात घोषणा केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कला, वाणिज्य आणि विज्ञान या विद्याशाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. हीच परिस्थिती राहिली तर प्राध्यापक भरतीला ग्रहण लागू शकते. परिणामी प्राध्यापक पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांच्या हाती केवळ प्राध्यापक भरतीचे गाजर राहील,अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे.