शिरवळ येथील एमईएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त संस्कारमय उपक्रम

इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक, पौराणिक आणि आधुनिक गुरु-शिष्य जोड्यांचे आकर्षक वेशभूषेसह सादरीकरण केले.

शिरवळ येथील एमईएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त संस्कारमय उपक्रम

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

एम. ई. एस. इंग्लिश मीडियम स्कूल, शिरवळच्या माध्यमिक विभागात गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, संस्कारमय आणि वैचारिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे आणि गुरुंबद्दल आदर, कृतज्ञता व श्रद्धेची भावना दृढ करणे हा या उपक्रमामागील उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यानंतर मुख्याध्यापकांनी गुरूचे जीवनातील अनन्यसाधारण स्थान अधोरेखित करत, "जीवनाला योग्य दिशा देणारा प्रत्येक व्यक्ती हा आपला गुरू असतो," हा संदेश विद्यार्थ्यांना दिला. आई-वडील, शिक्षक, समाज आणि अनुभव यांच्याकडून सतत शिकण्याची वृत्ती जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले.

यानंतर इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक, पौराणिक आणि आधुनिक गुरु-शिष्य जोड्यांचे आकर्षक वेशभूषेसह सादरीकरण केले. रामकृष्ण परमहंस–स्वामी विवेकानंद, चाणक्य–सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सांदीपनी ऋषी–भगवान श्रीकृष्ण, राजमाता जिजाऊ–छत्रपती शिवाजी महाराज, बिरजू महाराज–माधुरी दीक्षित तसेच रमाकांत आचरेकर–सचिन तेंडुलकर या प्रेरणादायी गुरु-शिष्य जोड्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

यापैकी काही विद्यार्थ्यांनी आपल्या भूमिकांमधून गुरुंकडून मिळालेल्या संस्कारांचे, ज्ञानाचे आणि प्रेरणेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. "गुरू म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नसून व्यक्तिमत्त्व घडविणारा दीपस्तंभ आहे," हा संदेश त्यांच्या सादरीकरणातून प्रभावीपणे पोहोचला.

कार्यक्रमाच्या पुढील सत्रात इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या महत्त्वावर मनोगते व्यक्त केली. भारतीय गुरु-शिष्य परंपरा, गुरूविषयीची कृतज्ञता आणि जीवनातील योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांनी विचार मांडले.

ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेच्या भावनेने परिपूर्ण ठरलेल्या या कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गुरुपौर्णिमेचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची जोपासना करणारा आणि भारतीय संस्कृतीचा वारसा जपणारा अविस्मरणीय सोहळा ठरला.