SIR कामात हलगर्जीपणा भोवला; जिल्हा प्रशासनाकडून गटशिक्षण अधिकाऱ्याचे थेट निलंबन 

पालघर जिल्हा प्रशासनाने भारत निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) कार्यक्रमात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कडक कारवाई केली आहे. वसई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गोपाळ चौधरी यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

SIR कामात हलगर्जीपणा भोवला; जिल्हा प्रशासनाकडून गटशिक्षण अधिकाऱ्याचे थेट निलंबन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पालघर जिल्हा प्रशासनाने (Palghar District Administration) भारत निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (SIR) कार्यक्रमात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कडक कारवाई केली आहे. वसई पंचायत समितीचे (Vasai Panchayat Samiti) गटशिक्षणाधिकारी गोपाळ चौधरी (Gopal Chaudhary) यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. १३२ नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे (132 Nalasopara Assembly Constituency) सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त असलेल्या चौधरी यांच्या हलगर्जीपणामुळे मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेवर विपरीत परिणाम झाला. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड (District Collector Dr. Indurani Jakhar) यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५०अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई केली. 

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राज्यभरात राबवला जात आहे. वसई-विरार भागातही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया वेगाने सुरू होती. यासाठी विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी कर्मचारी व अधिकारी कामात निष्काळजीपणा दाखवत असल्याचे प्रकार समोर येत होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने थेट कारवाई करण्यास सुरुवात केली असून, गोपाळ चौधरी यांचा निलंबन हा पहिला ठळक निर्णय मानला जात आहे.

गोपाळ चौधरी यांची १३२ नालासोपारा मतदारसंघासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून विशेष नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्यांनी कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता वारंवार गैरहजर राहून कामात हलगर्जीपणा केला. त्यामुळे मतदार नोंदणी, दुरुस्ती आणि पडताळणीची महत्त्वाची प्रक्रिया अपूर्ण राहिली. 

या महत्त्वपूर्ण मतदारसंघातील कामकाजावर प्रतिकूल परिणाम झाल्याने निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या गंभीर बाबीची तातडीने दखल घेत पालघरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी चौधरी यांच्या निलंबनाचे आदेश दिले. हे आदेश जिल्हा परिषद पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाला वेळेचे बंधन असल्याने कामात टाळाटाळ करणाऱ्या प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत की, मतदार पुनरीक्षण मोहीम ही अत्यंत संवेदनशील आणि कालबद्ध जबाबदारी आहे. यात कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नाही. या कारवाईमुळे इतर कर्मचाऱ्यांमध्येही कामाबाबत जागरूकता वाढेल आणि मतदार याद्या अधिक शुद्ध व अचूक होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.