'अमृत'ची फेलोशिप जाहिरात न निघाल्याने विद्यार्थ्यांचा संताप, तातडीने अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची मागणी

राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थांच्या सर्वंकष धोरणानुसार सारथी, बार्टी, महाज्योती, आर्टी आणि टीआरटीआय या संस्थांनी पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या 'अमृत' संस्थेकडून अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.

'अमृत'ची फेलोशिप जाहिरात न निघाल्याने विद्यार्थ्यांचा संताप, तातडीने अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील विविध सामाजिक घटकांतील पीएच.डी. संशोधकांसाठी अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) (Ph.D.Scholarship Fellowship)  प्रक्रिया वेगाने सुरू झाली असताना, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (Economically weak elements) (ईडब्ल्यूएस) विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी' (अमृत) संस्थेकडून अद्याप फेलोशिपची जाहिरात (Fellowship advertisement delay) प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. परिणामी, हजारो ईडब्ल्यूएस संशोधकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, शासनाच्या समान संधीच्या धोरणालाच (Equal Opportunity Policy) या दिरंगाईमुळे तडा जात असल्याची भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त होत आहे.

राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थांच्या सर्वंकष धोरणानुसार सारथी, बार्टी, महाज्योती, आर्टी आणि टीआरटीआय या संस्थांनी पीएच.डी. अधिछात्रवृत्तीसाठी जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या 'अमृत' संस्थेकडून अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. त्यामुळे संशोधनासाठी आर्थिक सहाय्याची अपेक्षा असलेल्या विद्यार्थ्यांना अनिश्चिततेचा सामना करावा लागत असून, त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन नियोजनावर त्याचा थेट परिणाम होत आहे.

यासंदर्भात संशोधक विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, "शासनाचे धोरण सर्वांसाठी समान असल्याचे सांगितले जाते. मग इतर सर्व संस्थांची फेलोशिप प्रक्रिया सुरू झाली असताना केवळ ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांनाच प्रतीक्षा का करावी लागत आहे? प्रशासकीय दिरंगाईमुळे आमच्या संशोधनाचे नुकसान होत असून, हा आमच्या न्याय्य हक्कावरच घाला आहे." विद्यार्थ्यांच्या मते, 'अमृत' संस्थेच्या कामकाजातील संथगती आणि लालफीतशाहीमुळे संशोधकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांनी पुढे सांगितले की, फेलोशिप ही केवळ आर्थिक मदत नसून संशोधन सुरू ठेवण्यासाठीचा महत्त्वाचा आधार आहे. जाहिरात प्रसिद्ध होण्यास होत असलेल्या विलंबामुळे प्रवेश प्रक्रिया, संशोधनाचा कालावधी आणि शैक्षणिक नियोजन यावर विपरीत परिणाम होत आहे. इतर प्रवर्गातील संशोधकांची प्रक्रिया पुढे जात असताना ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना मात्र प्रतीक्षेत ठेवणे हा दुजाभाव असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.

दरम्यान, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील संशोधकांनी 'अमृत' संस्थेने तातडीने पीएच.डी. अधिछात्रवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज प्रक्रिया सुरू करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. शासनाने समान संधी आणि समान न्यायाच्या तत्त्वानुसार या प्रकरणात त्वरित निर्णय घेऊन विलंब दूर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता 'अमृत' संस्था आणि संबंधित प्रशासन यावर किती लवकर निर्णय घेतात, याकडे राज्यभरातील ईडब्ल्यूएस संशोधकांचे लक्ष लागले आहे.