हजारो विद्यार्थ्यांचे वकिल होण्याचे स्वप्न भंगणार? विधी महाविद्यालयांनी BCI च्या अटी पूर्ण केल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या १६१ पैकी ५६ आणि तीन वर्षीय अभ्यासक्रमाच्या २१८ पैकी ९३ अशा एकूण १४९ महाविद्यालयांना पसंतीक्रमातून वगळले आहे. यामुळे हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला असून त्यांच्या वकील होण्याच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हजारो विद्यार्थ्यांचे वकिल होण्याचे स्वप्न भंगणार? विधी महाविद्यालयांनी BCI च्या अटी पूर्ण केल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील विधी शिक्षणाच्या प्रवेश (Access to Legal Education) प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया (BCI) आणि उच्च शिक्षण विभागाकडे  (Department of Higher Education) आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) पाच वर्षीय विधी अभ्यासक्रमाच्या १६१ पैकी ५६ आणि तीन वर्षीय अभ्यासक्रमाच्या (5-Year and 3-Year Law Courses) २१८ पैकी ९३ अशा एकूण १४९ महाविद्यालयांना पसंतीक्रमातून वगळले आहे. यामुळे हजारो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला असून त्यांच्या वकील होण्याच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विधी महाविद्यालयांना BCI ची मान्यता आणि उच्च शिक्षण विभागाच्या अटींची पूर्तता अनिवार्य आहे. मात्र अनेक महाविद्यालयांनी ही पूर्तता न केल्याने त्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात आले आहे. यामध्ये काही सुप्रसिद्ध संस्था तसेच शासकीय विधी महाविद्यालयांचाही समावेश असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंता वाढली आहे. युवासेनेकडे याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात महाविद्यालयांनी पात्रतेच्या अटी पूर्ण केल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी केली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच संबंधित महाविद्यालये, विभाग किंवा BCI यांनी पूर्तता करणे गरजेचे होते. विद्यार्थी विधी शिक्षणापासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी सरकारची राहील, असे युवासेनेने स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील या परिस्थितीमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकार आणि संबंधित विभागांनी तातडीने पावले उचलून अटींची पूर्तता करून प्रवेश प्रक्रिया सुरळीत करणे आवश्यक असल्याचे मत पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 
________________________________________

यामुळे अनेक हुशार विद्यार्थी चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशापासून वंचित राहू शकतात खरंतर एक सुद्धा हुशार विद्यार्थी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्यापासून वंचित राहिला तर याचीदेखील नैतिक जबाबदारी शासनाची असेल तसेच महाविद्यालयांच्या आजुबाजूच्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अशक्य होऊ शकते त्यामुळे या सर्व महाविद्यालयांनी पूर्तता पूर्ण केल्यानंतरच प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचे सीईटी सेल यांना आदेश द्यावेत.

-  प्रदीप सावंत, युवासेना सिनेट सदस्य