बार्टीच्या २५ कोटींच्या जीईई-नीट कोचिंग योजनेवर प्रश्नचिन्ह; प्रशासनाने घेतली गंभीर दखल

भविष्यात कोचिंग संस्थांच्या निवडीसाठी किमान ३० टक्के निकाल लागण्याची अट लागू करण्यात येणार आहे. तसेच निवड झालेल्या १०० टक्के विद्यार्थ्यांची परीक्षेला अनिवार्य उपस्थिती सुनिश्चित करण्यासारख्या कडक निकषांची अंमलबजावणी केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

बार्टीच्या २५ कोटींच्या जीईई-नीट कोचिंग योजनेवर प्रश्नचिन्ह; प्रशासनाने घेतली गंभीर दखल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नुकत्याच जाहीर झालेल्या जेईई-नीट निकालात बार्टीच्या (BARTI JEE NEET Coaching Scheme) माध्यमातून मोफत प्रशिक्षण घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा निकाल (JEE NEET Results) अपेक्षापेक्षा खूपच कमी लागला. शासनाने या महत्त्वाकांक्षी योजनेवर तब्बल २४ कोटी ८८ लाख रुपये खर्च (Expenditure of 24.88 crore) केले होते. तरीही विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे बार्टीच्या जेईई आणि नीट कोचिंग योजनेवर प्रश्नचिन्ह (Questions raised over BARTI's JEE and NEET coaching scheme) उपस्थित होत आहेत. विद्यार्थी संघटनांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी तसेच निकृष्ट निकाल देणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाईची मागणी (Demand for strict action) केली आहे.

बार्टीने २०२३-२०२५ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राज्यातील विविध विभागांतून एकूण ९०० विद्यार्थ्यांची निवड केली होती. मात्र यातील केवळ ३५७ विद्यार्थी मुख्य परीक्षेला बसले. त्यापैकी अवघ्या १७६ विद्यार्थ्यांना जेईई किंवा नीट परीक्षा उत्तीर्ण करण्यात यश आले. नियामक मंडळाच्या बैठकीत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत एकूण निकाल अवघा १९.५५ टक्के इतकाच लागला आहे. काही खाजगी कोचिंग संस्थांचा निकाल तर शून्य ते दोन टक्क्यांच्या घरात असल्याचे उघड झाले आहे.

या निकालाची गंभीर दखल घेत बार्टीच्या महासंचालिका दीपा मुधोळ-मुंडे यांनी मागील बॅचेसच्या निकालांची फेरतपासणी करण्याची तयारी दर्शवली आहे. भविष्यात कोचिंग संस्थांच्या निवडीसाठी किमान ३० टक्के निकाल लागण्याची अट लागू करण्यात येणार आहे. तसेच निवड झालेल्या १०० टक्के विद्यार्थ्यांची परीक्षेला अनिवार्य उपस्थिती सुनिश्चित करण्यासारख्या कडक निकषांची अंमलबजावणी केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या योजनेतील अपयशाने प्रश्न निर्माण झाले आहेत. बार्टी प्रशासनाने आता कठोर नियम लागू करून भविष्यातील प्रशिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचे आश्वासन दिले आहे. इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी अधिकृत माहितीसाठी बार्टीच्या अधिकृत माध्यमांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.