विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करायला आम्हाला सुध्दा आवडत नाही : पोलीस आयुक्त रितेश कुमार
विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करायला आम्हाला सुध्दा आवडत नाही.परंतु,कायद्याचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे.त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये " ,असा सल्ला पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी विद्यार्थ्यांना दिला.
![विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करायला आम्हाला सुध्दा आवडत नाही : पोलीस आयुक्त रितेश कुमार](https://eduvarta.com/uploads/images/2023/11/image_750x_655892b023faf.jpg)
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
" गेल्या दहा वर्षांपासून मी पुणे शहरात राहत आहे.परंतु,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) निर्माण झालेले अशा प्रकारचे वातावरण मी कधीही पहिले नव्हते. पुन्हा ते निर्माण होणार नाही यांची जबाबदारी पोलीस व विद्यापीठ प्रशासनाची आहे. त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थी संघटनांनी (students and student organizations) आपापसात न भांडता, कोणी चुकीचे वागत असेल तर पोलीस व विद्यापीठातील सक्षम अधिकाऱ्यांकडे जावे. विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करायला आम्हाला सुध्दा आवडत नाही. परंतु,कायद्याचे रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे.त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये " ,असा सल्ला पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार (Police Commissioner Ritesh Kumar) यांनी विद्यार्थ्यांना दिला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन विद्यार्थी संघटनांमध्ये झालेल्या वादामुळे विद्यापीठाचे वातावरण ढवळून निघाले.त्यामुळे विद्यापीठाच्या प्रतिमेला धक्का बसला.परिणामी विद्यापीठात कधी नव्हे ते पोलिसांनी १४४ कलम लागू करावे लागले.या पार्श्वभूमीवर विद्यापीठ व पोलीस प्रशासनातर्फे सर्व विद्यार्थी संघटनांबरोबर समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त रितेश कुमार बोलत होते.कार्यक्रमास अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा , विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी,प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर,प्रभारी कुलसचिव डॉ.विजय खरे, माजी पोलीस अधिकारी जयंत उमराणीकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा : UGC NET : नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ६ ते १४ डिसेंबरदरम्यान होणार परीक्षा
विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मोठा वारसा आहे.तूम्हाला या विद्यापीठात प्रवेश मिळाला ही खूप मोठी गोष्ट असून त्याचा सदुपयोग करा. चुकीच्या गोष्टी त्यामुळे तुमच्याच आयुष्यामध्ये अंधार निर्माण होईल,असे वागू नका.एक चांगले नागरिक होऊन देशासाठी,समाजासाठी चांगले योगदान द्या. पुढील काळात तुमच्यातीलच काही विद्यार्थी पोलीस, प्रशासन, राजकारण, शिक्षण व समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत होणार आहेत. त्यामुळे लहान लहान गोष्टींसाठी तुमचे करिअर वाया घालू नका.तुमच्या आई-वडिलांनी तुमच्यासाठी केलेल्या काष्ठावर व पाहिलेल्या स्वप्नांवर तुम्ही पाणी फेरू नका.अभ्यासाकडे लक्ष देऊन शिस्तीचे पालन करा.आपसामध्ये भांडण- वाद घालू नका.
---------------------------------