पीएचडी विद्यार्थ्यांच्या लॉंगमार्चनंतर शासन झाले जागे ; थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांशी होणार चर्चा
राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत संवाद साधून मार्ग काढू, असे शिष्टमंडळातील सदस्य तुकाराम शिंदे यांना दूरध्वनीद्वारे सांगितले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य भरातील बार्टी, सारथी, महाज्योतीच्या (Barti, Sarthi, Mahajyoti) संशोधक विद्यार्थ्यांनी (PhD students) जाहीर केल्यानुसार विविध प्रलंबित मागण्यांसाठी व शिष्यवृत्तीसाठी सोमवारी (दि. २४) पुण्यातील महात्मा फुलेवाड्यापासून ते मुंबईतील विधानभवनापर्यंत (Mahatma Phulewada to Vidhan Bhawan) पायी लॉंगमार्च (Long March) काढण्यास सुरूवात केली. महात्मा फुलेवाड्यापासून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत पायी लॉंगमार्च काढल्यानंतर शासनाला जाग आली.सोमवारी सायंकाळी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी या आंदोलनाचे समन्वयक तुकाराम शिंदे (Tukaram Shinde) यांच्याशी मोबाईलवर संवाद साधला. तसेच यावर संवादातून मार्ग काढू,असे सांगत मंगळवारी दुपारी शिष्टमंडळाला मुंबईत चर्चेसाठी बोलावले. महाजन यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर प्रलंबित मागण्या मंजूरीसाठी ठेवल्या जाणार आहेत.
तुकाराम शिंदे म्हणाले, माझ्यासह काही पीएच.डी च्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ मुंबईत चर्चेसाठी आले आहे. या शिष्टमंडळात प्रवीण गायकवाड, सीमा वानखेडे, नमिता खरात, गौरव सांगळे, दीपक वस्के, संदीप आखाडे, ऋषिकेश लबडे नितीन आंधळे आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाने निमंत्रित केले आहे.
दरम्यान, राज्य शासनाने बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या कामकाजात एकसमानता आणण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यामुळे राज्यभरातील संशोधक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या हक्कासाठी एल्गार करत पायी लॉंगमार्च काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता संशोधक विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होणार की काही वेगळा निर्णय राज्य शासनाकडून घेतला जाणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.