पुण्यातील इंजिनीअरिंग काॅलेजला ठोकले टाळे, हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजला टाळे ठोकण्यात आले आहे. काॅलेजकडे असलेल्या थकबाकीमुळे वसतीगृहातील विद्यार्थ्यांना बाहेर काढून कॉलेजला टाळे ठोकल्याचा प्रकार समोर घडला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजला टाळे ठोकण्यात आले आहे. (Abhinav Education Society Engineering and Technology College) काॅलेजकडे असलेल्या थकबाकीमुळे वसतीगृहातील विद्यार्थ्यांना बाहेर काढून कॉलेजला टाळे ठोकल्याचा प्रकार (Pune College Sealed) समोर घडला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह पालकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोरपासून काही अंतरावर वडवाडी येथे अभिनव एज्युकेशन सोसायटीचे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज आहे. कॉलेजची इमारत आणि १४ हेक्टर परिसरात हे कॉलेज आहे. बँक ऑफ बडोदाची ३२ कोटी रुपयांची थकबाकी या काॅलेजकडे आहे. कॉलेज प्रशासनाने ही थकबाकी वेळेत न भरल्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरून कॉलेजला टाळे ठोकण्यात आले आहे.
कॉलेजच्या वसतीगृहात जवळपास ८०० विद्यार्थी होते. त्यांनाही बँकेने बाहेर काढत सर्व मालमत्तेवर ताबा मिळवला आहे. या कारवाईमुळे डिप्लोमा आणि डिग्री शाखांमधील एकूण १६५० विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. इंग्लिश मीडियम स्कूलमधील सुमारे २५० विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला आहे. अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या या इंजिनिअरींग ॲड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या सहा शाखा, डिग्रीच्या पाच शाखा आणि इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
याच महिन्यात १७ जानेवारीपासून इंजिनिअरिंगच्या परीक्षा आहे. अशा परिस्थितीत काॅलेज प्रशासन इंजिनिअरींगच्या परीक्षा कशा घेणार?, का विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण बंद होणार ? असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडले असून त्याचे भविष्य अंधारमय झाल्यासारखे वाटत आहे. या प्रकरणावर काॅलेज प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाणार असून, बँक अधिकारी यांच्याशी उच्च स्तरावर बैठक सुरु आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयात देखील हे प्रकरण सुरु आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत यातून मार्ग काढण्यात येईल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.