'एकता पर्व २०२६' अंतर्गत 'एक भारत श्रेष्ठ भारत' कार्यक्रमाचा उत्साहात समारोप
विद्यार्थ्यांनी लोककला, वेशभूषा, हस्तकला, पर्यटन, खाद्यसंस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्यांचे आकर्षक व माहितीपूर्ण सादरीकरण केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
केंद्रीय विद्यालय संघटनेच्या 'एकता पर्व २०२६' उपक्रमांतर्गत आयोजित 'एक भारत श्रेष्ठ भारत' कार्यक्रमाचा दुसरा व अंतिम दिवस पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्र. २, एएफएस, पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पुणे संकुलातील आठ केंद्रीय विद्यालयांतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी नागालँड तसेच अंदमान व निकोबार बेटे या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या संस्कृतीवर आधारित कला-वस्तू (Artefacts) आणि प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी लोककला, वेशभूषा, हस्तकला, पर्यटन, खाद्यसंस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्यांचे आकर्षक व माहितीपूर्ण सादरीकरण केले. संशोधनाधारित मांडणी आणि कल्पकतेमुळे प्रदर्शनाला उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

प्रदर्शनाचे परीक्षण जय श्रीराम कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ. अर्चना संजय देसाई, एमआयटी आळंदीच्या सहाय्यक प्राध्यापक श्रीमती संजय पी. शिंदे तसेच एचजीएम आझम कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या निवृत्त सहाय्यक प्राध्यापक श्रीमती मुमताज शेख यांनी केले. परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेसह विषयावरील सखोल अभ्यासाचे कौतुक केले.
यानंतर भारतीय ज्ञान परंपरा (Indian Knowledge System – IKS) या विषयावर आधारित इंग्रजी माध्यमातील प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. भारतीय गणित व खगोलशास्त्र, आरोग्य व निरोगी जीवनशैली, पर्यावरण व शाश्वत विकास तसेच भारतीय स्थापत्यकला या विषयांवरील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची चाचणी या स्पर्धेद्वारे घेण्यात आली.
समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या श्री एस. पी. पाटील यांनी सहभागी विद्यार्थी, शिक्षक आणि विजेत्यांचे अभिनंदन केले. भारतीय ज्ञानपरंपरेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना, सांस्कृतिक जाणीव आणि भारतीय परंपरेबद्दल अभिमान निर्माण होतो, असे सांगितले.
प्राचार्य श्री भारत भूषण, मुख्याध्यापक श्री संजय कुमार पाटील आणि पीजीटी (वाणिज्य) श्रीमती हंसा अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा दोन दिवसीय कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या योगदानाचेही यावेळी कौतुक करण्यात आले.
राष्ट्रीय एकात्मता, विविधतेतील एकता आणि परस्पर सांस्कृतिक आदानप्रदानाचा संदेश देणारा 'एक भारत श्रेष्ठ भारत' उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.