महाराष्ट्रातील प्रसिद्ध 'महेश ट्युटोरियल्स'च्या सर्व ३३ शाखा बंद; ३ हजार विद्यार्थी अडचणीत 

अनेक पालकांनी संस्थेकडून फसवणूक झाल्याचा आरोप करत शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले आहे. मुंबईतील अंधेरी शाखा चार दिवसांपूर्वीच बंद करण्यात आली. महेश ट्युटोरियल्सच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून अरिहंत अकादमीमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध 'महेश ट्युटोरियल्स'च्या सर्व ३३ शाखा बंद; ३ हजार विद्यार्थी अडचणीत 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य कोचिंग संस्था 'महेश ट्युटोरियल्स'ने (Coaching institute 'Mahesh Tutorials') राज्यातील सर्व ३३ शाखा बंद (Mahesh Tutorials 33 branches closed) करण्याचा निर्णय घेतला आहे. १९८८ मध्ये महेश शेट्टी (Founder Mahesh Shetty) यांनी सुरू केलेल्या या संस्थेने तब्बल ३८ वर्षे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थी आणि पालक हैराण झाले आहेत. संस्थेत सध्या ३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिकत होते (More than 3,000 students were studying) आणि त्यांनी पूर्ण वर्षाची फी आधीच भरलेली आहे. 

या निर्णयानंतर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अनेक पालकांनी संस्थेकडून फसवणूक झाल्याचा आरोप करत शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले आहे. मुंबईतील अंधेरी शाखा चार दिवसांपूर्वीच बंद करण्यात आली. महेश ट्युटोरियल्सच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून अरिहंत अकादमीमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. अरिहंत अकादमीने याला सहमती दर्शवली असून, महेशचे विद्यार्थी आता त्या शाखांमध्ये सामील होतील. मात्र अचानक शिक्षक आणि वातावरण बदलल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होऊ शकतो, अशी चिंता पालकांनी व्यक्त केली आहे.

महेश ट्युटोरियल्समध्ये कार्यरत असलेल्या अनेक शिक्षकांनाही या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. संस्थेने अनेक शिक्षकांना राजीनामा देण्यास सांगितल्याचे समजते. शैक्षणिक वर्ष अधिच सुरू झालेले असल्याने आता नवीन नोकरी शोधणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे. अधिकाऱ्यांनी शिक्षकांना पालकांसोबत बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत, तरीही क्लासेस बंद करण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारीचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. अरिहंत अकादमीत विद्यार्थी शिफ्ट झाले असले तरी अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती आणि शिक्षक बदल यामुळे परीक्षांच्या तयारीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खासगी कोचिंग क्लासेसच्या नियमनासाठी कठोर कायद्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. अशा अनपेक्षित क्लासेस बंदीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्यातील नियोजन बिघडू नये, यासाठी सरकारने तातडीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणात शिक्षण विभागाने तपास करून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हिताचे रक्षण करणे गरजेचे असल्याचे मत पालकांकडून व्यक्त केले जात आहे. महेश ट्युटोरियल्ससारख्या जुन्या आणि विश्वासार्ह संस्थेच्या अचानक बंद होण्याने खासगी शिक्षण क्षेत्रातील असुरक्षितता अधोरेखित झाली आहे. विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता अरिहंत अकादमीत नियमित अभ्यास सुरू ठेवावा आणि पालकांनी अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन घ्यावे, असे सांगण्यात आले आहे.