बाल शिक्षण मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात

विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत तसेच संतांच्या रूपात सजून टाळ-मृदंग, अभंग आणि विठ्ठल नामाच्या गजरात शाळा परिसरात पालखीची प्रदक्षिणा काढली. या भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर वारकरी संप्रदायाच्या उत्साहाने भारावून गेला.

बाल शिक्षण मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा उत्साहात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या डेक्कन जिमखाना येथील बाल शिक्षण मंदिर शाळेत आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक वारकरी संप्रदायाची संस्कृती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पालखी सोहळा व वृक्षदिंडी उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आली. धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका मोनिका खेडलेकर यांच्या हस्ते पालखी पूजनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत तसेच संतांच्या रूपात सजून टाळ-मृदंग, अभंग आणि विठ्ठल नामाच्या गजरात शाळा परिसरात पालखीची प्रदक्षिणा काढली. या भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर वारकरी संप्रदायाच्या उत्साहाने भारावून गेला.

यावेळी शाळेच्या माजी पालक अर्चना मायदेव यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या पसायदानाचा अर्थ विद्यार्थ्यांना अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेत समजावून सांगितला. संत साहित्याचा जीवनातील सकारात्मक मूल्यांशी असलेला संबंध त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितला.

"भेटी लागी जीवा लागतसे आस..." या अभंगातील भावनेप्रमाणे शाळेच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनीही या सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली. याच प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी व प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश चंद्र हिरेमठ यांनी शाळेला विठ्ठल-रुक्मिणीची सुंदर मूर्ती भेट देऊन संस्थेबद्दलची आपुलकी व्यक्त केली. कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य दिलीप शेठ हेही उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना रेवडी आणि शिरा यांचा प्रसाद वाटण्यात आला. भक्ती, संस्कार आणि परंपरेची सांगड घालणारा हा पालखी सोहळा विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संत साहित्य आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्याचा शाळेचा उद्देश यशस्वीपणे साध्य झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.