मानवी बुद्धीमत्तेच्या जवळपासही कृत्रिम बुद्धीमत्ता नाही : डाॅ. विवेक सावंत

मानवी शरीरात अनेक गुणधर्म आहेत. अनुभव घेता येणे, योग्य अयोग्य ठरवणे, स्वप्न, कल्पना, भावना, प्रेम, सहवेदना हे माणसाच्या बुद्धीमत्तेची वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये कृत्रिम बुद्धीमत्तेत नाहीत.

मानवी बुद्धीमत्तेच्या जवळपासही कृत्रिम बुद्धीमत्ता नाही : डाॅ. विवेक सावंत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 " मानवी शरीरात अनेक गुणधर्म आहेत. अनुभव घेता येणे, योग्य अयोग्य ठरवणे, स्वप्न, कल्पना, भावना, प्रेम, सहवेदना हे माणसाच्या बुद्धीमत्तेची वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये कृत्रिम बुद्धीमत्तेत (artificial intelligence) नाहीत. त्यामुळे मानवी बुद्धीमत्तेच्या जवळपासही कृत्रिम बुद्धीमत्ता नाही." असे प्रतिपादन महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे अध्यक्ष आणि संगणकतज्ज्ञ डाॅ. विवेक सावंत (Dr. vivek sawant) यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित अनंत  व्याख्यानमालेत डाॅ. विवेक सावंत यांनी "भागीदारी- मानवी आणि कृत्रिम बुद्धीमत्तांची" या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आधीसभा  सदस्य ॲड. संदीप कदम, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम. पवार, सहसचिव (प्रशासन) ए. एम. जाधव, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एम. जी. चासकर, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे आदी उपस्थित होते.

डाॅ. विवेक सावंत  म्हणाले, कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे नवीन तंत्रज्ञान, संशोधन सार्वत्रिक, कमी किंमतीत, मोठ्या क्षमतेने, समानतेच्या पातळीवर विकसित होत आहेत. आज विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमतेचा वापर करून वेगाने काम सुरू आहे. शिक्षण, व्यापार, वैद्यकीय,पर्यटन, मनोरंजन अशा विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केला जात आहे. मोठ्या प्रमाणात रोज नवनवीन ॲप्स येत आहेत. सत्तावीस लाखापेक्षा जास्त ॲप्स जगभरात वापरले जातात. त्याबद्दल नकारात्मक बाबींपेक्षा सकारात्मक बाबींचा विचार व्हायला हवा. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या जाणार अशी भीती बाळण्यात अर्थ नाही. माणसाचे यंत्र होऊ नये आणि यंत्रांचा माणूस होऊ नये. मानवी व कृत्रिम बुद्धिमत्ता एकमेकांचे नाहीत असं मानून मानवी व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भागीदारीतून माणसाची प्रगती करण्याचा विचार करायला हवा. 

प्रास्ताविकात मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी अनंत व्याख्यानमालेचा उद्देश व उपयोगिता स्पष्ट केली. सूत्रसंचालन डॉ. माया माईनकर, अमृता खराडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. एम.जी.चासकर यांनी केले.

-----------------------------------


"मानवाचे अस्तित्व आजही टिकून आहे याचं कारण भाषा हे आहे. आज भाषेला मर्यादा नाही. कोणती तरी एक भाषा आली पाहिजे. क्षणात भाषांतराची सोय उपलब्ध आहे. मराठी भाषेचा बिनधास्तपणे वापर करा इंग्रजी भाषेचे मंडलिकत्व स्वीकारयची गरज नाही."

- डाॅ. विवेक सावंत , अध्यक्ष , महाराष्ट्र ज्ञान महामंडळ