Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar : अर्ज करण्यासाठी उरले फक्त दोन दिवस
महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून दरवर्षी मुलांची ऊर्जा, दृढनिर्धार, क्षमता, उमेद आणि उत्साहाचा गौरव करण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्रदान केले जातात.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी (Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar) दि. १५ सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून (WCD Ministry) करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याची तारीख ३१ ऑगस्ट पर्यंत होती. ही मुदत वाढवून १५ सप्टेंबर करण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी आता फक्त दोनच दिवस उरले आहेत.
महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून दरवर्षी मुलांची ऊर्जा, दृढनिर्धार, क्षमता, उमेद आणि उत्साहाचा गौरव करण्यासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्रदान केले जातात. या पुरस्कारासाठी १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेले तसेच भारताचे नागरिकत्व आणि रहिवासी असलेले मुले, मुली या पुरस्कारासाठी अर्ज करु शकतात.
'स्वाधार’ योजनेच्या धर्तीवर विद्यार्थ्यांसाठी ‘आधार’ योजना
कोणीही भारतीय नागरिक देखील पुरस्कारासाठी पात्र असणा-या मुला-मुलींचे नामांकन करु शकतात. प्राप्त अर्जांची छाननी प्रथम छाननी समितीव्दारे केली जाते. अंतिम निवड राष्ट्रीय निवड समितीव्दारे केली जाते. दि. २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिवस या दिवशी पुरस्कार जाहीर केले जातील.
राष्ट्रपती यांच्याकडून नवी दिल्ली येथे दरवर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या विशेष समारंभात विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले जातात. पुरस्काराचे स्वरुप पदक, रोख एक लाख रुपये बक्षीस, प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र असे आहे. अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेची संपूर्ण माहिती तसेच पुरस्कारांसाठीचे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातूनच स्वीकारण्यात येणार आहे.
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.