डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंचे नाव निश्चित ; यांच्या गळयात पडणार कुलगुरू पदाची माळ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.संजय ढोले आणि कोल्हापूर विद्यापीठाचे डॉ. विजय फुलारी यांच्यापैकी एकाच्या गळ्यात कुलगुरू पदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
![डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंचे नाव निश्चित ; यांच्या गळयात पडणार कुलगुरू पदाची माळ](https://eduvarta.com/uploads/images/2024/01/image_750x_659b7bd414008.jpg)
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) कुलगुरू (Vice Chancellor )पदाच्या मुलाखती होऊन चार ते पाच दिवसांचा कालावधी उलटून गेला.परंतु,अद्याप नव्या कुलगुरूंचे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.संजय ढोले (Dr. Sanjay Dhole )आणि कोल्हापूर विद्यापीठाचे डॉ. विजय फुलारी (Dr. Vijay Phulari) यांच्यापैकी एकाच्या गळ्यात कुलगुरू पदाची माळ पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. विलास खरात (Dr. Vilas Kharat) यांचेही नाव चर्चेत होते. त्यामुळे कुलगुरु पदाचे मानकरी कोण ठरणार ? हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांचा कार्यकाल 31 डिसेंबरला संपुष्टात आला.त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे प्रभारी पदभार सोपवण्यात आला. राज्य शासनातर्फे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातच विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. तसेच 19 डिसेंबर रोजी अंतिम पाच उमेदवारांच्या मुलाखती सुध्दा घेतल्या जाणार होत्या. त्यामुळे परंतु काही कारणास्तव त्या पुढे ढकलण्यात आल्या. पुढे ४ जानेवारी रोजी पात्र उमेदवारांच्या अंतिम मुलाखती पार पडल्या. त्यानंतर एक ते दोन दिवसात कुलगुरू पदाचे नाव जाहीर होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, अद्याप नाव जाहीर झाले नाही.
हेही वाचा : तलाठी भरती: नॉर्मलायझेशनच्या नावाखाली गुण वाढीचा फंडा ? यामुळेच उडाला गोंधळ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. संजय ढोले आणि डॉ. विलास खरात तसेच कोल्हापूर विद्यापीठाचे डॉ. विजय फुलारी, ज्योती जाधव आणि प्रा.राजेंद्र काकडे या अंतिम पाच उमेदवारांमधून एकाच्या गळ्यात कुलगुरू पदाची माळ पडणार असल्याचे निश्चित झाले होते. परंतु, अंतिम मुलाखतीनंतर विलास खरात, ज्योती जाधव आणि राजेंद्र काकडे यांचे नाव मागे पडले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कुलगुरू पदी ढोले किंवा फुलारी यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तवली जात आहे.