परीक्षांचे निकाल वेळेत लावा; दहा गावे दत्तक घ्या : राज्यपालांच्या कुलगुरूंना सूचना 

विद्यापीठांनी ऑलिम्पिक विजेते खेळाडू तयार होण्यासाठी प्रयत्न करावेत.

परीक्षांचे निकाल वेळेत लावा; दहा गावे दत्तक घ्या : राज्यपालांच्या कुलगुरूंना सूचना 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये,नोकरीच्या संधीमध्ये अडचणी येऊ नयेत.यासाठी त्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत,असे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी दिले.तसेच प्रत्येक कुलगुरूंनी दहा गावे दत्तक घेऊन  त्यांचा सामाजिक विकास कसा होईल याकडे विशेष लक्ष द्यावे.त्याचप्रमाणे महाविद्यालय परिसर हा नशामुक्त ठेवण्याचे आवाहनही बैस यांनी यावेळी केले.

 राजभवन येथे राज्यपाल बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक घेण्यात आली.यावेळी बैस बोलत होते.याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा,मुख्य सचिव डॉ.नितीन करीर,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्यपाल यांचे सचिव श्वेता सिंघल,उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर,तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर,उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर अवर सचिव विकास कुलकर्णी यांच्यासह सर्व विद्यापीठाचे कुलगुरू आदी उपस्थित होते.

बैस म्हणाले,महाविद्यालयांनी एकत्रित येऊन  क्लस्टर युनिव्हर्सिटी बनविण्याचा प्रयत्न करावा.तसेच विद्यापीठांनी ऑलिम्पिक विजेते खेळाडू तयार होण्यासाठी प्रयत्न करावेत.नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शासन अग्रेसर आहे.प्रत्येक कुलगुरूंनी विद्यापीठांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर अहवाल पाठवावा.उच्च शिक्षणामध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. एनआयआरएफ (NIRF) रैंकिंगमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील विविध महाविद्यालये,विद्यापीठाचा समावेश वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, जर्मनीला विविध क्षेत्रात चार लाख कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. याबाबत महाराष्ट्र शासन आणि जर्मन यांच्यात सामंजस्य करार होणार असून जर्मन कंपन्यांकडून मुलाखती घेऊन त्यांची निवड केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना जर्मन येथे जाण्याची व्यवस्था शासनाकडून केली जाणार आहे.

लोढा म्हणाले,विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण मिळावे यासाठी सर्व महाविद्यालयात कौशल्य केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत.प्रत्येक महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे.

करीर म्हणाले,विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी विविध भाषा आणि कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे.यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत.खाजगी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनाही कोणत्याही शासकीय,निमशासकीय कार्यालयात इंटर्नशिप करण्याची मुभा द्यावी.
विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्र डिजीलॉकर सुविधेद्वारे विद्यार्थ्यांना तातडीने उपलब्ध करून द्यावे.त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच पदवी प्रमाणपत्र  वापरता येईल. अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.दरम्यान सुकाणू समितीचे सदस्य अनिल राव यांनी नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत सादरीकरण केले.