आरटीई प्रवेश प्रक्रियेला शिक्षण विभागाकडून सुरूवात : संचालक शरद गोसावी
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले,प्राथमिक शिक्षण विभागातर्फे डिसेंबर महिन्यातच येत्या शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रवेशाची प्राथमिक तयारी सुरू केली जाईल.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE-आरटीई ) दिल्या जाणाऱ्या 25 टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशासाठी राबविल्या जाणा-या आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या (RTE Online Admission Process) तयारीला राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून (Primary Education Department) डिसेंबर महिन्यातच सुरूवात केली आहे. त्यामुळे आपल्या पाल्याचा आरटीई अंतर्गत प्रवेश व्हावा,यासाठी प्रयत्न करणाऱ्या इच्छुक पालकांना सुध्दा आवश्यक कागदपत्र जमा करण्याची तयारी सुरू करावी लागणार आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेला शाळांकडून कसा प्रतिसाद दिला जात आहे, हे पाहणे सुध्दा महत्वाचे ठरणार आहे.
आरटीई अंतर्गत सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 25 टक्के जागांवर प्रवेश दिला जातो.दरवर्षी तयासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रावाबली जाते. प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या तुलनेत सुमारे 3 ते 4 पट अर्ज येतात. त्यामुळे ऑनलाईन लॉटरी काढून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातात.मात्र, तरीही ऑफलाईन पद्धतीने प्रवेश मिळण्यासाठी काही पालक प्रयत्न करतात. काही दिवसांपूर्वी पुण्यातील वाघोली परिसरातील पोदार स्कूलमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश मिळवून देतो, असे सांगून पालकांची फसवणूक करणाऱ्या शाळेच्या अकाऊंटट विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे पालक पुन्हा अशा प्रलोभनांना बळी पडू नये, याबबात शिक्षण विभागाला काळजी घ्यावी लागणार आहे.
राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी 'एज्युवार्ता' शी बोलताना म्हणाले, प्राथमिक शिक्षण विभागातर्फे डिसेंबर महिन्यातच येत्या शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रवेशाची प्राथमिक तयारी सुरू केली जाईल. आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी करणे, ऑनलाईन यंत्रणेची तपासणी करणे, पालकांना आवश्यक दाखले काढून ठेवण्याचे आवाहन करणे, पालकांमध्ये प्रवेशासंदर्भात जागृती करणे आदी बाबत प्राथमिक तयारी केली जात आहे.
दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया उशीरा सुरू केली जाते. त्यामुळे आरटीईचे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अभ्यासात मागे राहतात.त्यामुळे या वर्षी प्रवेश प्रक्रिया नियोजित कालावधीत पूर्ण करावी,अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.