Winter Session Nagpur : दोन विद्यार्थ्यांची मानसिक तणावातून आत्महत्या ! शाळेच्या वेळा बदलण्याचा मुद्दा पुन्हा तापला
विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी अधिवेशनात बोलताना शाळेच्या वेळा बदलण्याचा मुद्दा उपस्थित केला.
Vijay Vadettawar News : सध्याच्या काळात सर्वांच्याच झोपेच्या वेळा बदलल्या आहेत. मध्यरात्रीनंतरही मुले जागीच राहतात. मात्र, शाळांसाठी त्यांना लवकर उठावे लागते. त्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. मुलांची झोप चांगली व्हावी या दृष्टीने शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विचार व्हावा, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी एका कार्यक्रमात केली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी अधिवेशनात बोलताना शाळेच्या वेळा बदलण्याचा मुद्दा उपस्थित केला.
अधिवेशनात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, नवी मुंबईत (Navi Mumbai) दोन विद्यार्थ्यांनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटना गंभीर आहेत. यावरून मुलांना किती मानसिक तणाव आहे हे लक्षात येते. वाढती स्पर्धा, अभ्यासक्रमाचे ओझे अशा कारणांनी या आत्महत्या वाढत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे ते म्हणाले.
हेही वाचा : New Education Board : देशपातळीवर आणखी एका बोर्डाची भर : रामदेवबाबांच्या भारतीय शिक्षण मंडळाला मान्यता
मुलं मानसिक तणावात शिकतात. त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे शाळेच्या वेळा बदलण्यासाठी शासनाकडे विचारणा केली होती. राज्यात शाळेची वेळ सकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान आहे. यामुळे झोप पूर्ण होत नाही. मुलांमध्ये प्रचंड तणाव वाढत असल्याचे दिसून येत आहे, असल्याचे ही वडेट्टीवार म्हणाले.
मुलांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी शाळेच्या वेळा बदलल्या पाहिजेत. अपुऱ्या झोपेमुळे मुलांमध्ये आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुलांचे आरोग्य, मानसिक स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी शासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.