नाटकात प्रभू श्रीराम-सीतामातेचा अपमान केला; IIT बाॅम्बेने विद्यार्थांना सव्वा लाखाचा दंड ठोठावला..

आयआयटी प्रशासनाने सात विद्यार्थ्यांवर ही कारवाई केल्याचे समोर आले आहे.

नाटकात प्रभू श्रीराम-सीतामातेचा अपमान केला; IIT बाॅम्बेने विद्यार्थांना सव्वा लाखाचा दंड ठोठावला..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

इंडियन इस्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी (IIT Bombay) ने आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना नाटकात प्रभू श्रीराम आणि सीतामातेचा अपमान केल्याप्रकरणी १ लाख २० हजारांचा दंड ठोठावला (IIT Bombay Students Fine for Ramayan Play)  आहे. काही दिवसांपुर्वी आयआयटी बाॅम्बेच्या वार्षिक कला महोत्सवात काही विद्यार्थ्यांकडून प्रभू श्रीराम आणि सीतामातेवर आधारित 'राहोवन' (IIT Bombay Raahovan Play) या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकात प्रभू राम आणि सीतामातेचा अपमानास्पद आणि हिंदू संस्कृतीचा अनादर करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. 

सादरीकरण करण्यात आलेले नाटक आणि त्यातील आशयाबद्दल सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. त्याची दखल घेत आयआयटी प्रशासनाने सात विद्यार्थ्यांवर ही कारवाई केल्याचे समोर आले आहे.  या नाटकात सहभागी झालेल्या पदवीधर विद्यार्थ्यांना जिमखाना पुरस्कारांमध्ये कोणतीही मान्यता मिळणार नाही. त्यांच्या सोबत काम केलेल्या अन्य काही विद्यार्थ्यांना प्रत्येकी 40 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यांना वसतिगृहाच्या सुविधांपासून बंदी घालण्यात आली आहे.

आयआयटी मुंबईच्या विविध विभाग आणि शैक्षणिक वर्षांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले 'राहोवन' नाटकाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत असताना वादाचे केंद्र बनले. या व्हिडिओमध्ये सीता आणि लक्ष्मण या पात्रांमधील संभाषणावर प्रेक्षक मोठ्या आवाजात प्रतिक्रिया व्यक्त करताना आढळतात. या नाटाकावर भाष्य करताना समिक्षकांनी मुख्य पात्रांना नकारात्मक पद्धतीने साकारल्याचे आणि हिंदू संस्कृती आणि धार्मिक भावनांची खिल्ली उडवल्याचा आरोप केला.

आयआयटी बॉम्बेने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक शिस्तपालन समिती स्थापन केली. या समितीने नाटकातील विद्यार्थ्यांना बोलावून चर्चा आणि चौकशी केली. त्यानंतर सखोल विचार केल्यानंतर, समितीने दंड आणि इतर शिस्तभंगाच्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला. समितीच्या निर्णयावर भाष्य करताना विद्यार्थ्यांच्या समर्थकांनी म्हटले की, हे नाटक आदिवासी समाजाचे स्त्रीवादी विवेचन आहे आणि त्याला अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला.