राज्यात आरटीईच्या २७ हजार जागा रिक्त; विशेष फेरी राबवण्याची मागणी
पुणे जिल्ह्यात आरटीईच्या १७ हजार ५८८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यापैकी केवळ १३ हजार ६६५ प्रवेश निश्चित झाले आहेत. तर अद्याप ४ हजार पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
यंदा शालेय शिक्षण विभागाच्या चुकीच्या निर्णयामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया (RTE Admission Process) अनेक महिने रखडली. त्यामुळे एकीकडे आरटीईअंतर्गत प्रवेश मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या पालकांना इतर शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागला. दरम्यान, चार प्रवेश फेऱ्या राबवून अद्याप राज्यात २७ हजार जागा रिक्त (27 thousand seats are vacant in the state) राहिल्या आहेत. त्यासाठी तातडीने प्रवेश फेरी राबवण्याची मागणी (Demand for immediate implementation of admission round) काही पालक संघटनांकडून केली जात आहे. पुणे जिल्ह्यात आरटीईच्या १७ हजार ५८८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यापैकी केवळ १३ हजार ६६५ प्रवेश निश्चित झाले आहेत. तर अद्याप ४ हजार पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत.
राज्यातील ९ हजार २१७ खासगी शाळांमध्ये १ लाख ५ हजार २३८ रिक्त जागांसाठी २ लाख ४२ हजार ५१६ विद्यार्थ्यांचे आरटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. ऑनलाइन सोडतीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर एका नियमित फेरीसह प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी तीन फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी दि. ८ ऑक्टोबरपर्यंत ७८ हजार ३९३ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. एकूण १ लाख २७ हजार जणांची निवड करून त्यातील फक्त ७८ हजार ३९३ जणांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत, तसेच मोठ्या संख्येने अर्ज फेटाळण्यात आल्याचे दिसून येत आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्येच प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी शिक्षण आयुक्त तसेच प्राथमिक शिक्षण संचालकांकडे करण्यात आली आहे.
______________________________________
मुळात आरटीई प्रवेश प्रक्रिया ही शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच राबवली गेली पाहिजे. यंदा ही प्रवेश प्रक्रिया न्यायालयाच्या कचाट्यात अडकल्याने खुप महिने रखडली. एका एका जागेच्या प्रवेशासाठी चुरस असताना राज्यात तब्बल २७ हजार जागा रिक्त राहणे हे दुर्दैवी आहे. सध्या निम्मे शैक्षणिक वर्ष संपत आले असून अशा परिस्थिती विशेष फेरी राबवून गरजवंत विद्यार्थ्यांना लवकर प्रवेश मिळणे अपेक्षित आहे.
दिलीप सिंग विश्वकर्मा महापेरेंट्स पालक संघटना
______________________________________
एका बाजूला २७ हजार रिक्त जागा आहेत तर दुसऱ्या बाजूला आरटीई मध्ये प्रवेश घेणारे आर्थिक दुर्बल घटकातील गरजवंत विद्यार्थी आहेत. मागील अनेक महिने प्रवेशाची प्रतीक्षा करून संधी मिळाली नाही, अशा विद्यार्थांसाठी विशेष फेरी राबवून प्रवेश प्रक्रिया राबवावी. या प्रकारची मागणी आमची पुर्वीपासूनची आहे. प्रवेशासाठी हजारो विद्यार्थी प्रतीक्षेत असताना जागा रिक्त ठेवण्यात काहीच अर्थ नाही.
शरद जावडेकर, कार्याध्यक्ष, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा