एमईएसच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत ‘पावनखिंड दौड’ उत्साहात

दौडीची सुरुवात प्रशालेच्या आवारातून झाली. खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक, फर्ग्युसन रोड, बी.एम.सी.सी. कॉलेज रोड, गोखले इन्स्टिट्यूट मार्गे फर्ग्युसन कॉलेज परिसरातून विद्यार्थ्यांनी हनुमान टेकडीपर्यंत धाव पूर्ण केली. संपूर्ण मार्गावर विद्यार्थ्यांनी शिस्त, उत्साह आणि देशभक्तीचे दर्शन घडविले.

एमईएसच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशालेत ‘पावनखिंड दौड’ उत्साहात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, डेक्कन जिमखाना येथे १३ जुलै रोजी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, इतिहासप्रेम आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करण्याच्या उद्देशाने
‘पावनखिंड दौड’ या प्रेरणादायी उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील पावनखिंडीच्या ऐतिहासिक संग्रामाची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या दौडीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अद्वितीय पराक्रमाची आठवण जागवत राष्ट्रभक्ती, शौर्य, त्याग आणि नेतृत्वगुण विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

दौडीची सुरुवात प्रशालेच्या आवारातून झाली. खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक, फर्ग्युसन रोड, बी.एम.सी.सी. कॉलेज रोड, गोखले इन्स्टिट्यूट मार्गे फर्ग्युसन कॉलेज परिसरातून विद्यार्थ्यांनी हनुमान टेकडीपर्यंत धाव पूर्ण केली. संपूर्ण मार्गावर विद्यार्थ्यांनी शिस्त, उत्साह आणि देशभक्तीचे दर्शन घडविले.

कार्यक्रमात इतिहास व साहित्यप्रेमी अभिजित अंबेकर यांनी शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी व्याख्यान दिले. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनावरील माहितीपूर्ण चित्रफीत दाखविण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा अधिक दृढ झाली.

उपक्रमाच्या निमित्ताने हनुमान टेकडीवर वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. राष्ट्रप्रेमाबरोबरच पर्यावरण संरक्षणाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचा स्तुत्य प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक रोहिदास भारमळ, पर्यवेक्षिका जयश्री शिंदे, ज्युनिअर कॉलेजचे योगेशचंद्र देवळालकर, क्रीडाशिक्षक गणेश हिले तसेच धनराज प्रजापती यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपक्रमाच्या शेवटी दौडीत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. ‘पावनखिंड दौड’सारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये शौर्य, त्याग, राष्ट्रभक्ती, इतिहासप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ होत असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.