Talathi Exam News : तलाठी परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट ; उमेदवारांना चुकलेल्या 114 प्रश्नांचे पूर्ण गुण मिळणार
प्रश्नसुचीवर मागविण्यात आलेल्या आक्षेपांनुसार 114 प्रश्न चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क :
Talathi Exam Update : नुकत्याच झालेल्या तलाठी भरती परीक्षेत प्रश्नसुचीवर मागविण्यात आलेल्या आक्षेपांनुसार 114 प्रश्न चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये 32 प्रश्नांचे पर्याय बदलण्यात आले आहे. या चुकीच्या प्रश्नांसाठी पूर्ण गुण देण्यात येणार असल्याची माहिती तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात 4 हजार 446 तलाठी पदांसाठी (Talathi Exam) परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी राज्य भरातून मोठ्या प्रमाणात 10 लाख 41 हजार 713 अर्ज आले होते. प्रत्यक्षात 8 लाख 64 हजार 960 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. अर्जांची संख्या जास्त असल्याने भूमी अभिलेख विभागाने ही परीक्षा तीन टप्प्यांत दिवसातील तीन सत्रांत घेतली होती.
त्यानुसार पहिला टप्पा 17 ते 22 ऑगस्ट आणि दुसरा टप्पा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर तर तिसरा टप्पा 4 ते 14 सप्टेंबरमध्ये या कालावधीत घेण्यात आला. त्यासाठी परीक्षेची एकूण ५७ सत्रे घेण्यात आली होती.
प्रश्न किंवा उत्तरसुचीबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार 2 हजार 831 प्रश्नांवर 16 हजार 205 आक्षेप प्राप्त झाले होते. यामध्ये 9 हजार 72 आक्षेप मान्य करण्यात आल्याची माहिती नरके यांनी दिली आहे. त्यात 146 प्रश्नांचा समावेश आहे. त्यातील 32 प्रश्नांचे प्रश्नसुचीतील पर्याय बदलण्यात आले आहेत. तर 114 प्रश्न किंवा उत्तरे चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्ण गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही नरके यांनी सांगतिले.
पेसा क्षेत्रातील जागांबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून अद्याप निर्देश आलेले नाहीत. भूमी अभिलेख विभागाने गुणसुची तयार केली आहे. अंतिम निर्देश आल्यानंतर ती जाहीर केली जाईल. त्यानंतर निवडसुचीही प्रसिद्ध करण्यात येईल, असे नरके यांनी स्पष्ट केले आहे.