बालभारतीच्या पुस्तकांच्या किमती वाढल्या; सहावीची नवीन पुस्तके उशीरा मिळणार

बालभारतीच्या पुस्तकांच्या किमती वाढल्या; सहावीची नवीन पुस्तके उशीरा मिळणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी, तिसरी,चौथी आणि सहावीची पाठ्यपुस्तके बदलली असून बालभारतीतर्फे विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत. दुसरी, तिसरीची पाठ्यपुस्तके बाजारात विक्रीसाठी लवकर उपलब्ध होणार असली तरी इयत्ता सहावीची काही पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी 15 ते 20 जून उजाडणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाठ्यपुस्तकांच्या किमतीत सुमारे ८ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध होणार असल्याने शाळा सुरू झाल्यावर प्रथमतः ब्रिज कोर्स च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. 

विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार एनसीईआरटीने तयार केलेल्या पुस्तकांच्या आधारे बालभारतीने अधिक चांगल्या पद्धतीने पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली आहे.अध्ययन निष्पत्तीचा विचार करून पाठ्यपुस्तकांच्या रचनेत बदल करण्यात आला आहे.

गणिताच्या पुस्तकात जादुई गणित, गणितीय कोडे यांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. तसेच विज्ञानाच्या पुस्तकात आजूबाजूच्या परिसराचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने पाठांची रचना केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्याला आपल्या जिल्ह्याच्या भूगोलाचा अभ्यास करता यावा, या उद्देशाने तशी रचना केली असून भूगोलाच्या पुस्तकात त्या त्या जिल्ह्याच्या भूगोलाचा समावेश केला आहे. तसेच मराठीच्या पुस्तकात मालवणी व वऱ्हाडी बोलीचा अंतर्भाव केला आहे.

अभ्यासक्रम न बदललेली नियमित पुस्तके ही शाळा सुरू होण्याच्या दिवशी मिळणार असून बदललेली पुस्तके आठवड्याभरात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. तर इयत्ता सहावीची काही पुस्तके मिळण्यास 15 ते 20 जून पर्यंत वाट पहावी लागणार आहे.

---------------

बालभारतीने यंदा नवीन चार पुस्तके तयार केली आहेत. बालभारतीच्या इतिहासात प्रथमच चार पुस्तके बदलली आहेत. सर्व पुस्तके दर्जेदार आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विचार करून तयार केली आहे. लवकरच सर्व पुस्तके विद्यार्थ्यांच्या हात मिळतील. 

- अनुराधा ओक,संचालक, बालभारती