म. ए. सो. वाघीरे विद्यालयात ‘पावनखिंड दौड’ उत्साहात; विद्यार्थ्यांना स्वराज्याच्या इतिहासाची प्रेरणा
मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांनी प्रास्ताविकात पावनखिंडच्या ऐतिहासिक लढ्याचे महत्त्व अधोरेखित करत वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय शौर्याची आठवण करून दिली.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या वाघीरे विद्यालय व म. ए. सो. क्रीडावर्धिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पावनखिंड दौड’ उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. स्वराज्याच्या इतिहासातील पराक्रम, शौर्य आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे यांनी प्रास्ताविकात पावनखिंडच्या ऐतिहासिक लढ्याचे महत्त्व अधोरेखित करत वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय शौर्याची आठवण करून दिली. प्रमुख पाहुणे गुरु सेवा मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष कुंडलिक शंकरराव पाटोळे यांचा परिचय बालविकास शाळेचे शिक्षक महाजन सर यांनी करून दिला.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव व शाळेचे महामात्र सुधीर भोसले यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रमुख पाहुणे कुंडलिक पाटोळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, वीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमांच्या प्रेरणादायी कथा विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या ओघवत्या आणि प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.

यानंतर सुधीर भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नेतृत्व, दूरदृष्टी, शौर्य, संघटन कौशल्य यांसारख्या गुणांचा उल्लेख करत ‘पावनखिंड दौड’ उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. तसेच विद्यार्थ्यांना ऑलिम्पिक स्पर्धांचे महत्त्व आणि क्रीडास्पर्धांमधून विकसित होणाऱ्या मूल्यांविषयी मार्गदर्शन केले.
उपक्रमांतर्गत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसमवेत शाळेपासून वाघ डोंगरापर्यंत ‘पावनखिंड दौड’ पूर्ण करून शौर्य, चिकाटी आणि संघभावनेचा अनुभव घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व व्यासपीठावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव व शाळेचे महामात्र सुधीर भोसले, मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, उपमुख्याध्यापक सुरवसे सर, पर्यवेक्षिका सौ. लडकत, बालविकास प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडदे तसेच एम. ई. एस. इंग्रजी माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज जागडा उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सूर्यकांत खैरनार यांनी केले, तर आभारप्रदर्शन बालविकास शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब बडदे यांनी केले. स्वराज्याचा इतिहास, राष्ट्रप्रेम आणि क्रीडामूल्यांची सांगड घालणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.