नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये गणवेश वाटपाची अनास्था; ४५ हजार विद्यार्थी महिनाभर प्रतीक्षेत

नवी मुंबई महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिना उलटला तरी सुमारे ४५ हजार गोरगरीब विद्यार्थ्यांना अद्याप शालेय गणवेश मिळाले नाहीत. शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थी साध्या युनिफॉर्मशिवाय वर्गात बसत आहेत.

नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये गणवेश वाटपाची अनास्था; ४५ हजार विद्यार्थी महिनाभर प्रतीक्षेत

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवी मुंबई महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक (Navi Mumbai Primary and Secondary) शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक महिना उलटला तरी सुमारे ४५ हजार गोरगरीब विद्यार्थ्यांना (School uniforms for 45,000 students) अद्याप शालेय गणवेश मिळाले नाहीत. शाळा सुरू झाल्यानंतरही विद्यार्थी साध्या युनिफॉर्मशिवाय वर्गात बसत आहेत. प्रशासनाने गणवेश पुरवठ्याचा प्रस्ताव उशिरा महासभेत मांडल्याने काम (Administration proposes uniforms) वेळेत सुरू होऊ शकले नाही. महासभेने जुन्या ठेकेदारालाच काम देण्याचा निर्णय घेतला, तरीही गणवेश तयार करून वाटप करण्यात मोठा विलंब झाला आहे. यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

गणवेशांबरोबरच शालेय साहित्य, वह्या, दप्तर, बूट, मोजे, पीटी व स्काऊट गणवेश तसेच रेनकोटचे वाटपही अद्याप झालेले नाही. प्रत्येक वर्षी हाच अनुभव विद्यार्थ्यांना येतो. यंदाही प्रशासनाच्या अनास्थेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होत आहे. शिक्षण विभागाच्या उपायुक्त संघरत्ना खिलारे यांनी १५ जुलैपर्यंत गणवेशांचे वाटप पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही मुदत हुकल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक पालक म्हणतात, “आमचे मुलगे शाळेत गणवेशाशिवाय जात आहेत, यामुळे त्यांच्या मनात हिन भावना येत आहे.

”दरम्यान, नववी, दहावी, बालवाडी आणि सीबीएसई पॅटर्नच्या शाळांमधील सुमारे १८ हजार विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहारही टेंडर वादात अडकला आहे. पोषण आहार न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये दरवर्षी गणवेश, शालेय साहित्य आणि पोषण आहार पुरवठ्यात सातत्याने होणारा विलंब हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे.

पालक संघटनांनी महापालिका आयुक्तांकडे तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला अशा प्रकारची अनास्था विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण करते. महापालिकेने यापुढे अशा गंभीर बाबींसाठी वेळापत्रक आखून कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचा हक्काचा दर्जेदार शिक्षणाचा अधिकार मिळू शकेल.