MHT-CET गैरप्रकाराच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती, तर MPSC साठी SIT; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

MHT-CET बाबतच्या तक्रारींमुळे चार सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात आली असून, पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने परीक्षा केंद्रे आणि निकालांचे लेखापरीक्षण (ऑडिट) करण्याचे आदेश दिले आहेत.

MHT-CET गैरप्रकाराच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती, तर MPSC साठी SIT; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रातील MHT-CET परीक्षेतील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना MHT-CET संदर्भातील तक्रारींची सखोल चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असून एमपीएससी परीक्षांमधील गैरप्रकारासाठी चार दिवसात SIT स्थापन करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

MHT-CET परीक्षेतील काही परीक्षा केंद्रांबाबत तसेच परीक्षा प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत संशयित परीक्षा केंद्रांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. तसेच परीक्षेच्या निकालाचेही ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले असून, परीक्षा प्रक्रियेत काही अनियमितता आढळल्यास त्याची सखोल तपासणी केली जाणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून MHT-CET प्रक्रियेत पारदर्शकता राहणे आवश्यक आहे. चौकशी समितीच्या माध्यमातून प्राप्त तक्रारी, परीक्षा केंद्रांशी संबंधित बाबी आणि परीक्षा प्रक्रियेतील संभाव्य अनियमितता यांचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई केली जाईल.

दरम्यान, MHT-CET प्रकरणापासून स्वतंत्रपणे MPSC परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. MPSCच्या २०२५ मधील गट-ब आणि गट-क पूर्व व मुख्य परीक्षांसह मागील काही वर्षांतील परीक्षांचीही SITमार्फत चौकशी करण्यात येणार आहे.

त्यामुळे राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांमधील कथित गैरप्रकारांवर सरकारने एकाचवेळी कठोर पावले उचलली आहेत. MHT-CET चौकशी समितीच्या अहवालातून नेमक्या कोणत्या बाबी समोर येतात आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे.