कृषी सेवा मुख्य परीक्षेतील उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; तत्काळ नियुक्तीपत्र देण्याचे सरकारचे निर्देश 

महाराष्ट्र कृषी सेवा २०२४ मधील उमेदवारांना वैद्यकीय आणि पोलीस पडताळणीनंतर आठ दिवसांच्या आत नियुक्तीपत्रे मिळतील.

कृषी सेवा मुख्य परीक्षेतील उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; तत्काळ नियुक्तीपत्र देण्याचे सरकारचे निर्देश 

एज्यावार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २०२४ मधील २५८ शिफारसप्राप्त उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुढील आठ दिवसांत सर्व उमेदवारांची वैद्यकीय तपासणी व पोलीस पडताळणी पूर्ण करून तत्काळ नियुक्तीपत्र देण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. या निर्णयामुळे दीर्घ काळ प्रतीक्षा करणाऱ्या गुणवंत उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या या परीक्षेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही नियुक्तीपत्रे प्रलंबित राहिल्याने उमेदवारांमध्ये नाराजी होती.

जाहिरात निघून जवळपास दोन वर्षे उलटली होती. निकाल, अंतिम निवड आणि शिफारशीची प्रक्रिया पूर्ण झाली असतानाही नियुक्ती थांबल्याने उमेदवारांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात कृषिमंत्री भरणे यांची भेट घेऊन नियुक्तीची मागणी केली. मंत्र्यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षेच्या माध्यमातून कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी आणि कृषी अधिकारी कनिष्ठ या पदांसाठी २५८ उमेदवारांची निवड झाली होती. शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी १९ जून २०२६ रोजी कृषी विभागास प्राप्त झाली. त्यानंतर विभागाने आवश्यक कार्यवाही करून २१ जुलै २०२६ रोजी सर्व उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण केली. असे असतानाही नियुक्ती लांबणीवर पडणे योग्य नव्हते, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, हे सर्व तरुण मेहनत करून परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या नियुक्तीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील आठ दिवसांच्या आत वैद्यकीय तपासणी, पोलीस पडताळणी आणि नियुक्तीपत्र वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. विभागाकडून पाठपुरावा करून प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी, असेही त्यांनी सांगितले. यामुळे उमेदवारांना लवकरच शासकीय सेवेत रुजू होण्याची संधी मिळणार आहे.