शासकीय वसतिगृह प्रवेश व स्वाधार योजनेच्या नूतनीकरण अर्जांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

महाराष्ट्र समाज कल्याण विभागाने २०२६-२७ या वर्षासाठी वसतिगृह प्रवेश आणि 'स्वाधार' योजनेच्या नूतनीकरणासाठीचे अर्ज सादर करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढवली आहे.

शासकीय वसतिगृह प्रवेश व स्वाधार योजनेच्या नूतनीकरण अर्जांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

समाज कल्याण विभागाने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी शासकीय वसतिगृहांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत नूतनीकरणाचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविली आहे. सहायक आयुक्त राजू एडके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केली. सीईटी सेलमार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू असल्याने विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळावा या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज https://hmasnew.mahait.org/ या पोर्टलवर स्वीकारले जात आहेत. या अर्जांच्या आधारे तयार होणाऱ्या प्रवेश याद्या ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध केल्या जातील. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे अडचण येऊ नये म्हणून विभागाने वेळेवर ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०२५-२६ मध्ये स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या आणि सन २०२६-२७ साठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नूतनीकरणाचे ऑनलाईन अर्जही ३० सप्टेंबरपर्यंत स्वीकारले जातील. नूतनीकरण अर्जामध्ये विद्यार्थ्यांना मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करण्याची सुविधा तसेच चालू अभ्यासक्रमाची माहिती अद्ययावत करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरणे अधिक सोपे आणि अचूक होणार आहे.

सन २०२५-२६ मध्ये अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या आणि स्वाधार योजनेचा लाभ मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही सन २०२६-२७ मध्ये शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता यावा यासाठी पोर्टलवर विशेष सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. सहायक आयुक्त राजू एडके यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज भरावेत असे आवाहन केले आहे. यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना वसतिगृह आणि स्वाधार योजनेचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.