बाल शिक्षण मंदिरात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
‘गेले ते दिवस आठवल्या त्या गमती-जमती, बाशिमच्या दारी पुन्हा जुळती नाती; कितीही मोठे झालो तरी शालामातेची जागा कोणी घेऊ शकत नाही,’ अशा भावनिक शब्दांत माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना, पुणे येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील माजी विद्यार्थी मेळाव्याचे पहिले पुष्प मंगळवारी दि. ८ सप्टेंबर रोजी शाळेच्या प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
‘पुन्हा वाटे लहान व्हावे, पाठीवरती दप्तर घ्यावे; पुन्हा वाटे शाळेत जावे, अन् जगण्याचे सोने व्हावे’ या भावनेने भारलेल्या या मेळाव्यात तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जुन्या वर्गाच्या आठवणी, आपली बसण्याची जागा, शिक्षक, मित्र-मैत्रिणी आणि शालेय जीवनातील गमती-जमतींना उजाळा देत माजी विद्यार्थी पुन्हा एकदा शाळेच्या आठवणींमध्ये रमले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यमान विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांसाठी सादर केलेल्या ‘वंदे मातरम्’ या गीताने झाली. ज्येष्ठ माजी शिक्षिका सौ. गोसावी आणि ज्येष्ठ माजी विद्यार्थी श्री. आनंद विंझे यांच्या हस्ते शालामातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी उपस्थित माजी विद्यार्थी, माजी शिक्षक, हितचिंतक आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्यासाठी शाळेतर्फे सुश्राव्य गायनाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या संगीत कार्यक्रमाने उपस्थितांच्या जुन्या आठवणींना आणखी उजाळा मिळाला.
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने श्री. महाबळेश्वरकर आणि डॉ. भक्ती दातार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी शाळेतील विविध उपक्रम, शाळेची प्रगती तसेच शाळेबद्दलचा आदर आणि जिव्हाळा आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
‘गेले ते दिवस आठवल्या त्या गमती-जमती, बाशिमच्या दारी पुन्हा जुळती नाती; कितीही मोठे झालो तरी शालामातेची जागा कोणी घेऊ शकत नाही,’ अशा भावनिक शब्दांत माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर यांनी केले. सौ. सोनपाटकी यांनी सूत्रसंचालन केले, तर सौ. मंजुश्री गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
जुन्या आठवणींना उजाळा देत शाळा, शिक्षक आणि मित्र-मैत्रिणींशी पुन्हा नाते दृढ करणारा हा माजी विद्यार्थी मेळावा आनंद, उत्साह आणि भावनिक वातावरणात पार पडला. पुन्हा एकत्र येण्याचा संकल्प करत या संस्मरणीय मेळाव्याची सांगता झाली.