शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; १७ सप्टेंबरपासून ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू

महाराष्ट्रातील शाळांमध्ये १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत 'सेवा संकल्प अभियान' राबवले जाणार असून, याद्वारे समाजसेवा, जनजागृती आणि विद्यार्थी उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल.

शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; १७ सप्टेंबरपासून ‘सेवा संकल्प अभियान’ सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्याचे आदेश जारी केले आहेत. या अभियानांतर्गत विविध कृती कार्यक्रम शाळांसाठी अनिवार्य असले तरी विद्यार्थ्यांचा सहभाग पूर्णतः ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. विकसित भारत २०४७ या संकल्पनेवर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. उत्कृष्ट चित्रे आणि वक्तृत्व सादरीकरणांचे प्रदर्शन शाळा, जिल्हा तसेच राज्यस्तरावर आयोजित केले जाईल.

२ ऑक्टोबर रोजी प्रत्येक तालुक्यात ‘नमो सेवागाथा’ कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी कला व नाट्य पथकांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती विद्यार्थी व नागरिकांपर्यंत पोहोचविली जाईल. या उपक्रमाद्वारे सेवा आणि सामाजिक जागरूकतेचा संदेश प्रभावीपणे देण्याचे उद्दिष्ट आहे.

‘सेवा माझे योगदान’ अंतर्गत स्वच्छता, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, कचरा वर्गीकरण, जलसंधारण, रस्ता सुरक्षा, सायबर सुरक्षा, सैनिकांचा सन्मान आणि दिव्यांगजन सहयोग यांसारखे उपक्रम राबविता येतील. इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन, डिजिटल साक्षरता तसेच वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे कार्यक्रमही समाविष्ट आहेत. प्रत्येक शाळेने स्थानिक गरजेनुसार किमान एका अर्थपूर्ण सेवा उपक्रमाची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

मुख्याध्यापक शाळास्तरीय समन्वयक, गट शिक्षण अधिकारी तालुकास्तरीय नोडल अधिकारी तर शिक्षणाधिकारी जिल्हास्तरीय समन्वयक म्हणून काम पाहतील. उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ आणि यशोगाथांचे दस्तऐवजीकरण करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. या अभियानाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव आणि सामाजिक जबाबदारीची भावना वृद्धिंगत होईल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.