रेणुकास्वरूप प्रशालेत ‘पालवी’ गटाची प्रथम सभा उत्साहात संपन्न

एकल पालकांना येणाऱ्या विविध अडचणींना सामोरे जाण्यासाठी तसेच मुली आणि पालक यांच्या मानसिक, शारीरिक व भावनिक विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या उद्देशाने हा गट स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून भविष्यात विविध उपक्रम, मार्गदर्शन सत्रे आणि संवादाच्या माध्यमातून पालकांना आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सौ. फणसळकर आणि सौ. कांबळे यांनी सांगितले.

रेणुकास्वरूप प्रशालेत ‘पालवी’ गटाची प्रथम सभा उत्साहात संपन्न

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

रेणुकास्वरूप प्रशालेच्या व्यक्तिमत्त्व विकास केंद्राच्या वतीने एकल पालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘पालवी’ गटाची प्रथम सभा भावे शाळेच्या सभागृहात मंगळवारी दि. ८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवनाने झाली. व्यक्तिमत्त्व विकास केंद्राच्या सौ. फणसळकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. शुभांगी कांबळे यांनी प्रास्ताविकातून ‘पालवी’ गट स्थापन करण्यामागील भूमिका स्पष्ट केली.

एकल पालकांना येणाऱ्या विविध अडचणींना सामोरे जाण्यासाठी तसेच मुली आणि पालक यांच्या मानसिक, शारीरिक व भावनिक विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या उद्देशाने हा गट स्थापन करण्यात आला आहे. या माध्यमातून भविष्यात विविध उपक्रम, मार्गदर्शन सत्रे आणि संवादाच्या माध्यमातून पालकांना आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सौ. फणसळकर आणि सौ. कांबळे यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या व्यक्तिमत्त्व विकास केंद्राच्या मुख्य समन्वयक सौ. गिरिजा लिखिते प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी एकल पालकांसमोरील विविध आव्हानांवर प्रकाश टाकत, या आव्हानांवर एकत्रितपणे कशा प्रकारे मात करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच परस्पर संवाद, सहकार्य आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पालक व मुलांच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

सभेदरम्यान पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले विचार व अपेक्षा व्यक्त केल्या. दर महिन्याला अशा प्रकारची सभा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली. ‘पालवी’ गटाची संकल्पना अत्यंत उपयुक्त व सकारात्मक असल्याचे सांगत पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

या उपक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ. शुभांगी कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. जाधव आणि पर्यवेक्षक श्री. अनासपुरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

एकल पालकांना आधार, संवाद आणि सकारात्मक सहकार्य देत पालक व विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा ‘पालवी’ गटाचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.