बारामती सुपे घाटात धक्कादायक घटना! ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात
बारामतीजवळील सुपे घाटात उलटलेल्या एसटी बसमधून सुमारे ४० विद्यार्थी प्रवास करत होते. यात चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बारामती परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्या प्रतिष्ठानच्या संकुलात जाणाऱ्या सुमारे चाळीस विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा सुपे घाटात भीषण अपघात झाला. ही बस सकाळी सातच्या सुमारास पाटसवरून सुटली होती. कुसेगाव, पडवी, गायकवाड मळा या मार्गावरून सुपे घाटातून जात असताना बस उलटली. अपघातात चार ते पाच विद्यार्थी जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही.
अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोनद्वारे घटनाक्रम आणि जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेतली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवला आणि मदतीसाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. स्थानिक प्रशासनाने जखमींना तात्काळ वैद्यकीय मदत पुरवली. विद्यार्थ्यांच्या पालकांनाही घटनाक्रमाची माहिती देण्यात आली असून सर्वांची प्रकृती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी ट्विटद्वारे म्हटले की, विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची एसटी बस सुपे घाटात कोसळल्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे. काही विद्यार्थ्यांना थोडा मार लागला असला तरी नशीब जोराचे असल्याने कोणाच्याही जीवाला धोका झाला नाही. मात्र गेल्या आठवड्यात स्वारगेटहून बारामतीला जाणाऱ्या बस बंद पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता. एसटी महामंडळाच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासनाने तातडीने चौकशी करावी आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी केली.
या अपघातामुळे एसटी बसच्या देखभाल आणि ड्रायव्हिंगबाबत चर्चा सुरू झाली आहे. सुपे घाटासारख्या डोंगराळ आणि अवघड भागातून विद्यार्थ्यांच्या नियमित प्रवासासाठी अधिक सुरक्षित व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रशासनाने अपघाताची सखोल चौकशी सुरू केली असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. विद्यार्थी सुरक्षितपणे शिक्षण घेऊ शकतील यासाठी एसटी महामंडळाने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.