पॅट परीक्षेसाठी नियोजन शुन्य कारभार ? महेंद्र गणपुले यांचा आरोप
नियतकालिक मूल्यांकन चाचणीमध्ये अनेक त्रुटी असल्याचे समोर आले आहे. परीक्षा का घ्यावी ? विद्यार्थ्यांची क्षमता, मुल्यांकन, उपाययोजना, खर्च याचे कोणतेही नियोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून करण्यात आलेले नाही, असा आरोप महाराष्ट्र मुख्याध्यापक संघ मंडळाचे माजी अध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी केला आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ली ते ९ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT Exam) परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामध्ये अनेक त्रुटी (Errors in exam planning) असल्याचे समोर आले आहे. परीक्षा का घ्यावी ? विद्यार्थ्यांची क्षमता, मुल्यांकन, उपाययोजना, खर्च याचे कोणतेही नियोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (SCERT) करण्यात आलेले नाही, असा आरोप महाराष्ट्र मुख्याध्यापक संघ मंडळाचे माजी अध्यक्ष महेंद्र गणपुले (Mahendra Ganpule) यांनी केला आहे.
इंग्रजी, गणित आणि मराठी या तीन विषयांसाठी SCERT द्वारे समान प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन प्रमाणित करणे हा PAT परीक्षांचा मुख्य उद्देश असला तरी त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही. विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती पडताळणे व त्यामध्ये वाढ करणे, अध्ययन- अध्यापन प्रक्रिया सुलभ करण्यास मदत करणे, अध्ययन वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे यासारखे उद्देश ठेवून या परीक्षा राबवण्यात येत असल्या तरी त्याची सध्या काय परिस्थिती आहे? यावर गणपुले यांनी प्रकाश टाकला आहे. या परीक्षेच्या नियोजनासाठी वर्षाकाठी अंदाजे दहा कोटींच्या पुढे खर्च जातो. त्याचा नुकताच अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला आहे. एवढा खर्च करून विद्यार्थ्यांच्या पदरात काय पडते हा संशोधनाचा विषय आहे. कारण आत्ता पर्यंत झालेल्या परीक्षातून काय निरीक्षणे आढळली, त्यातून काय कमतरता आढळल्या, त्या शाळांना कळवून त्यावर काय उपाय योजना सुचवली, त्यानुसार विद्यार्थ्यांत काय बदल झाले? याचा कुठेही संदर्भ आढळत नाही,असेही गणपुले म्हणाले.
इयत्ता १ ली ते ९ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी संकलित आणि पायाभूत चाचणी घेण्यात येत असून या परीक्षांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही या परीक्षेचे उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याची टीका शिक्षण क्षेत्रातून करण्यात येत आहे. ही परीक्षा ज्या उद्देशाने घेतली जात आहे तो उद्देश पूर्ण होत आहे का? परीक्षेचे योग्य मूल्यमापन केले जात आहे का? यासाठी येणाऱ्या समस्यांवर शासन स्तरावर काय उपाय केले ? नियोजन आणि समस्यांचे काय? शाळांना भराव्या लागणाऱ्या आर्थिक भुर्दंडाचे काय? असे एक ना अनेक सवाल महेंद्र गणपुले यांनी उपस्थित केले आहेत.
__________________________________________________
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) कडून नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका किती लागणार यासाठी शाळांकडून पटसंख्या मागवणे आवश्यक आहे. मात्र ती मागवली जात नाही. त्यामुळे प्रश्नपत्रिकांचे संच शाळांना कमी प्रमाणात प्राप्त केले होतात. परिणामी मग शाळांना त्याच्या झेराॅक्स काढून विद्यार्थ्यांना वितरित कराव्या लागतात. यामध्ये शिक्षकांची मोठी धावपळ होते. प्रश्नपत्रिकांचे संच शाळांना उपस्थित करणे हा शाळांचा हक्क असताना त्याच्या झेराॅक्स काढण्यासाठी शाळांना भुर्दंड भरावा लागतो. त्यामुळे पुढील काळात या समस्या उद्भवू नयेत.
निलेश गायकवाड, मुख्याध्यापक, जिजामाता माध्यमिक विद्यालय, भोसरी