प्रियदर्शनी स्कूल मोशी येथे ‘कृषी दिन’ उत्साहात साजरा
कृषी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी कृषीविषयक माहितीपर उपक्रम, घोषवाक्य सादरीकरण आणि चर्चासत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी "शेतकऱ्यांचा सन्मान करू, पाणी वाचवू, पर्यावरणाचे रक्षण करू आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊ" असा सामूहिक संकल्प केला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे ‘कृषी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शेतीचे महत्त्व, शेतकऱ्यांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान आणि शाश्वत शेतीबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे सेवानिवृत्त कृषी अधिकारी श्री. परदेशी आणि यशस्वी प्रगतशील शेतकरी श्री. सत्यवान बटवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक शेती, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, कृषी क्षेत्रातील नव्या संधी आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील अनुभवांविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. "शेती हा केवळ व्यवसाय नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. प्रत्येक नागरिकाने अन्नदात्या शेतकऱ्यांविषयी आदर बाळगला पाहिजे," असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
स्व. वसंतराव नाईक यांच्या योगदानाचा जागर कार्यक्रमात शालेय शिक्षकांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानावर प्रकाश टाकला. त्यांच्या कार्यकाळात सुधारित बियाण्यांचा प्रसार, सिंचन सुविधांचा विस्तार, कृषी शिक्षणाला मिळालेली चालना आणि 'कापूस एकाधिकार खरेदी योजना' यांसारख्या क्रांतिकारी उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळाली. दुष्काळी भागांच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी केलेले कार्य यावेळी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनी घेतला 'हा' संकल्प
कृषी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी कृषीविषयक माहितीपर उपक्रम, घोषवाक्य सादरीकरण आणि चर्चासत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी "शेतकऱ्यांचा सन्मान करू, पाणी वाचवू, पर्यावरणाचे रक्षण करू आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊ" असा सामूहिक संकल्प केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि अन्नदात्याप्रती कृतज्ञतेची भावना अधिक दृढ झाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रियदर्शनी स्कूल, मोशीच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कृषी क्षेत्राविषयी एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.