चूक यंत्रणेची मग शिक्षा विद्यार्थ्यांना का?, 'TET' पेपर लीकवरून राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या तीन महत्त्वाच्या मागण्या

राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलेल्या तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये पहिली, MAHATET परीक्षेचे नवीन वेळापत्रक आजच्या आज जाहीर करावे. दुसरे, पेपरफुटीला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी आणि प्रामाणिक उमेदवारांना कोणताही त्रास होऊ नये. तिसरे, या प्रकरणामुळे ज्यांचे महत्वाचे वर्ष वाया गेले त्यांना वयोमर्यादेत सवलत द्यावी

चूक यंत्रणेची मग शिक्षा विद्यार्थ्यांना का?, 'TET' पेपर लीकवरून राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या तीन महत्त्वाच्या मागण्या

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नीट परीक्षेनंतर (NEET paper leak) महाराष्ट्रात शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या (MAHATET Paper leak) गंभीर प्रकरणाने राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे. तब्बल ६ लाख उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी पडले असून, परीक्षा रद्द झाल्यानंतर दोन आठवडे उलटूनही नवीन तारखेची घोषणा झालेली नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे संतप्त प्रश्न उपस्थित करत तीन महत्त्वाच्या मागण्या (3 important demands) केल्या आहेत. चूक यंत्रणेची शिक्षा प्रामाणिक विद्यार्थ्यांना का?, असा सवाल करत राहुल गांधींनी सोशल मीडियावरून सरकारला धारेवर धरले आहे.

जे देशाचे आणि राज्याचे भविष्य घडवणारे शिक्षक होणार आहेत, त्यांचेच भवितव्य आज अंधारात सापडले आहे. वर्षानुवर्षे अभ्यास करणारे, भरमसाठ फी भरून फॉर्म भरणारे आणि दूरदूरची परीक्षा केंद्रे गाठणारे उमेदवार आज प्रतीक्षेत आहेत. पेपर फोडणारे मोकाट फिरत असताना, भ्रष्ट यंत्रणा स्वतःला वाचवण्यात व्यस्त आहे आणि त्याची किंमत फक्त प्रामाणिक उमेदवारांना मोजावी लागत आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असे असल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

राहुल गांधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलेल्या तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये पहिली, MAHATET परीक्षेचे नवीन वेळापत्रक आजच्या आज जाहीर करावे. दुसरे, पेपरफुटीला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी आणि प्रामाणिक उमेदवारांना कोणताही त्रास होऊ नये. तिसरे, या प्रकरणामुळे ज्यांचे महत्वाचे वर्ष वाया गेले त्यांना वयोमर्यादेत सवलत द्यावी. या मागण्यांसह राहुल गांधी “अन्यायाविरुद्ध आता शांत बसणार नाही” असा स्पष्ट इशाराही दिला आहे.

या प्रकरणाने राज्यभरात मोठी चर्चा निर्माण केली आहे. लाखो तरुण शिक्षक होण्याच्या स्वप्नात होते. आता त्यांच्या पदरी निराशा आली आहे. राहुल गांधी यांच्या या भूमिकेला सोशल मीडियावर मोठा पाठिंबा मिळत आहे. अनेक उमेदवार आणि पालकांनी त्यांच्या पोस्टला शेअर करत सरकारकडून तातडीने तोडगा काढण्याची मागणी केली आहे. पेपर लीकच्या पुनरावृत्तीमुळे परीक्षा प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवरच गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

देशातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले. १७ जुलै रोजी डेहराडून येथे ते या मुद्द्यावर विशेष सभा घेणार आहेत. या सभेत पेपरफुटीच्या देशव्यापी समस्येवर आणि तरुणांच्या भविष्याशी होत असलेल्या खेळखंडोब्यावर चर्चा होणार आहे. “आता शिक्षण क्रांतीची वेळ आली आहे. अशी व्यवस्था निर्माण करायची आहे, जिथे मेहनतीचे फळ मिळेल, यंत्रणेच्या अपयशाची शिक्षा नाही,” असे ते म्हणाले. या प्रकरणावर सर्व स्तरांतून दबाव वाढत असल्याने, आगामी काही दिवसांत सरकार काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.